श्रीनगर – काश्मीर खोऱ्याच्या सीमावर्ती भागात अनेक निसर्गरम्य स्थळे असून त्या भागाचा पर्यटन क्षेत्रे म्हणून विकास करण्यासाठी सीमावर्ती भागात सहाशे किमी लांबीचे महामार्ग उभारण्याची योजना आखण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिली. गुलमर्ग आणि कारगीलला जोडणारा हा विशेष महामार्ग उभारण्यासाठी 8 हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. त्यात केरन, गुरेज, मच्चल हे भाग पर्यटकांना विशेष आकर्षित करतील असे आहेत, असे ते म्हणाले.
या मार्गासाठी 12 ते 13 ठिकाणी बोगदे उभारावे लागणार आहेत. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर या दुर्गम भागाचाहीं मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि तेथील स्थानिक लोकांनाही दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले. या भागातील सर्वच पर्यटनस्थळे गुलमर्ग इतकीच सुंदर आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
राज्याच्या प्रशासनाने जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण भागातील रस्ते संपर्क सुधारण्याचाही कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रति वर्षी 5000 किमीचे नवीन रस्ते उभारणीची योजना आहे, असे ते म्हणाले. स्थानिकांना रोजगार देण्यालाही मोठे प्राधान्य दिले जात असून येत्या काही वर्षात येथे किमान चार ते पाच लाख रोजगार उपलब्ध केले जातील, असे ते म्हणाले. येथे जागतिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षी येथे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट परिषद आयोजित केली जात असल्याची माहितीही मुख्य सचिवांनी दिली.