मुंबई : राज्यात उद्यापासून कृषि दिनानिमित्त “कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब करीत उद्यापासून ते 7 जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
कृषी मंत्री दादाजी भुसे कृषी सप्ताहाची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि कोणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार आहेत. याचबरोबर कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. 1 जुलै रोजी कृषिदिन साजरा केला जातो.