कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कामगार आता आक्रमक झाले असून त्यांनी जलसमाधी आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलनाच्या बाराव्या दिवशी आता एसटी कामगार आक्रमक झाले आहेत. सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून त्यांना आमचे काहीही देणेघेणे नाहीये आणि म्हणूनच सर्व निलंबित कर्मचाऱ्यांनी पंचगंगा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, जिल्ह्यातील मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे एसटी कामगारांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या 12 दिवसांपासून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र यामध्ये अद्याप काहीही निर्णय झाला नाहीये. त्यामुळे उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता पंचगंगा नदीत सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी म्हंटले.
यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र सरकार कोणत्याही प्रकारे सकारात्मक आहे असे वाटत नाहीये. आज सुद्धा बुलढण्यातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. शिवाय आत्तापर्यंत 40 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही सरकारला जाग येत नाहीये. त्यामुळे आता आमचा सरकारला निर्वाणीचा इशारा आहे. त्यामुळे उद्या कोल्हापूर आगारातील निलंबित कर्मचारी मिळून येथील पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी घेणार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
गेल्या 11 दिवसांपासून कोल्हापूरातील एसटी कर्मचारी विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. कोणत्याही प्रकारे आंदोलनाला गालबोट लागेल किंव्हा प्रशासनाला त्रास होईल असे उग्र आंदोलन केले नाहीये. मात्र आता सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ आमच्यावर आणली असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले.