कोल्हापूर (प्रतिनिधी) – करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शारदीय नवरात्रौत्सवांतर्गत पंचमीची पालखी आणि नगरप्रदक्षिणा वाहनातून काढण्यात येणार आहे. मात्र यावेळी परिसरात आणि मार्गावर भाविकांची गर्दी होणार नाही यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केलाय.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्रौत्सवाला १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक झाली.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे मंदिर दर्शनासाठी बंदच राहणार आहेत. याबाबत कोणताही निर्णय अद्याप राज्य शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे सध्या तरी बंद मंदिरात नवरात्रौत्सवाचे पारंपरिक आणि धार्मिक विधी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहेत.
शासनाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करून हे सर्व पारंपरिक विधी होतील. नवरात्रौत्सवाच्या काळात रोज होणारी पालखी, तसेच ललित पंचमी आणि दसरा सोहळा यासाठी शासनाच्या नियमानुसार व अटींची पूर्तता करून सर्व धार्मिक विधी करण्यात येणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.