मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीची निवड निश्चित झाली आहे. 23 ऑक्टोबरला याची अधिकृत घोषणा होईल. पण गांगुली अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अडचणी तर वाढणार नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गांगुली आणि शास्त्री यांच्यात अनेक गोष्टींमुळे मतभेद आहेत. गांगुली क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य असताना अनिल कुंबळे यांना प्रशिक्षकपदावरून हटवल्यानंतर गांगुली-शास्त्रींमधील वाद अधिक तीव्र झाला होता. 2016 साली संघाचा प्रशिक्षक होता न आल्यामुळे शास्त्री यांनी गांगुलीवर आरोप केले होते.
गांगुलीमुळेच माझी प्रशिक्षकपदी निवड झाली नसल्याचे शास्त्री म्हणाले होते. यानंतर शास्त्री मुर्खांच्या नंदनवनात राहतात, असे गांगुलीने त्याच्या नेहमीच्या स्टाईलने परखड उत्तर दिले होते. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने 2016 साली अनिल कुंबळेंची प्रशिक्षकपदी निवड केली होती.
2017 साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर विराट आणि कुंबळेमध्ये वाद झाले. त्यामुळे कुंबळेंनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. यानंतर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्रींना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. यंदा झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर 2020 साली होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट
स्पर्धेपर्यंत शास्त्रींनाच मुदतवाढ देण्यात आली. मात्र आता गांगुलीच्या नियुक्तीनंतर समिकरणे कशी बदलतात याबाबत उत्सुकता आहे.