बंगळुरू – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याला वारंवार अपयशी ठरूनही संधी दिली जात असल्याबद्दल भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुलमुळेच शिखऱ धवन, मयंक आग्रवाल, अजिंक्य रहाणे, इशान किशन व शुभमन गिल या गुणवान खेळाडूंवर अन्याय होत असल्याचे ताशेरेही त्यांनी ओढले आहेत.
राहुलची गेल्या दोन मोसमातील कामगिरी पाहिली तर आकडेवारीवरूनही तो साफ अपयशी ठरल्याचे समोर येते. तरीही त्यालाच सातत्याने का संधी दिली जात आहे. हे अन्य चार-पाच खेळाडू सातत्याने धावा करत आहेत. जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हाही त्यांनी प्रामाणिकपणे कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, निवड समितीच्या नजरेत ते कसे येत नाही याचे आश्चर्य वाटते, असे प्रसाद म्हणाले.
धवन, मयंक, रहाणे, इशान व गिल यांनी गेल्या दोन मोसमांपासून सातत्याने धावा केल्या आहेत. त्यातही भारतीय संघातून बाहेर केल्या गेलेल्या रहाणेने यंदाच्या रणजी स्पर्धेतही धावा केल्या आहेत. मात्र, त्याकडे निवड समिती साफ दुर्लक्ष करत आहे. राहुलवर इतका विश्वास का व कसा ठेवला जातो हे कोडेच आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी मिळून त्याला केवळ 23 धावा करता आल्या आहेत व ही कामगिरी नजरेत भरणारी निश्चितच नाही तरीही त्याचे संघातील स्थान अबाधित राहात आहे याचे नवल वाटते, असेही प्रसाद यांनी म्हटले आहे.
उपकर्णधारपद काढून काय साध्य होणार
राहुलकडून भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेतल्याचे सांगितले जात असले तरी त्यामुळे काय साध्य होणार आहे. ही जबाबदारी काढली म्हणजे तो सरस कामगिरी करेल असे निवड समितीला वाटत आहे का. असे जर त्यांचे मत असेल तर ते अद्याप भ्रमात वावरत आहेत, असेच म्हणावे लागेल, असेही प्रसाद यांनी नमूद केले आहे.