कॉपीबुक क्रिकेटमध्ये जशा पारंपरिक नियम आहेत तसेच तिसरा पंच, सामनाधिकारी यांच्या निर्णयांबाबतही काही गोष्टी अधारित आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीला ज्या पद्धतीने बाद दिले गेले ते पाहता जर फलंदाज बाद आहे की नाही असा संशय वाटत असेल तर त्याला लाभ फलंदाजालाच मिळायला हवा. बेनिफीट ऑफ डाऊट गोज टु बॅट्समन, असे म्हणतात त्याला काहीतरी अर्थ असेल का नाही.
दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याला मैदानावरील पंचांनी बाद घोषित केले. कुहेनमनच्या चेंडूवर कोहलीविरुद्ध पायचितचे अपील करण्यात आले. मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी त्याला बाद दिले. कोहलीने डीआरएस घेतल्यावरही तिसऱ्या पंचाने मेनन यांचाच निर्णय कायम राखला. काय तर म्हणे त्यांना कोहलीच्या पायाला चेंडू थेट लागला की बॅटला लागल्यावर पायाला लागला याचा पुरावा सापडला नाही व म्हणूनच त्याला बाद घोषित करण्यात आले. पण प्रश्न हा आहे की जर मैदानावरील पंचांच्या निर्णयाची अचुकता स्पष्ट होण्यासाठीच तिसरा पंच तंत्रज्ञानाचा वापर करतो व अचूक निर्णय घेतो.
हेच कोहलीच्या बाबतीत का घडले नाही. तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांच्या मनात जर कोहली बाद होता की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, तर त्या संभ्रमाचा किंवा संशयाचा लाभ कोहलीलाच मिळायला हवा होता. कोहली यावेळी 44 धावांवर खेळत होता. जगातील कोणत्याही फलंदाजाला बॅट-पॅड स्पर्शाबाबत सर्वात आधी समजते. कोहलीलाही ते कळले व त्याने पंचांच्या दिशेने आपली बॅट दाखवली. हे जगातील सर्वच फलंदाज करतात की चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला लागल्याचे पंचांना सांगितले किंवा दाखवले जाते. मात्र, पंचांनी निर्णय दिल्यावर कोहलीने संताप व्यक्त केला व डीआरएस घेतला.
जर या डीआरएसमुळेही योग्य निकाल हाती येत नसेल तर हे तंत्रज्ञान काही कामाचे नाही. त्यापेक्षा पायचितचा निर्णय देताना बॅट-पॅड झाल्याचा संशय असेल तर हॉटस्पॉट प्रणाली जास्त योग्य ठरेल. स्निकोमिटरपेक्षाही ही प्रणाली जास्त अचूक असते. त्यात चेंडू बॅटला लागल्याचा सबळ पुरावा मिळतो व गोंधळ न होता योग्य निकाल मिळतो.
असो, या मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत व त्यात निर्णय जास्तीत जास्त अचूक मिळतील ही अपेक्षा आहे. जर तिसरा पंच व त्याच्या जोडीला तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर योग्यच झाला पाहिजे व मैदानावरील पंच व तिसरा पंच आपल्या निर्णयाबाबत साशंक असेल तर त्याचा लाभ फलंदाजालाच मिळायला हवा. आयसीसीने सर्व संलग्न देशांच्या क्रिकेट मंडळांशी समन्वय साधत या नियमांची रचना जास्त सुस्पष्ट करावी.