लखनौ – सत्ताधारी भाजपचे बुलडोझर धोरण, बीबीसीच्या कार्यालयांवरील प्राप्तिकर विभागाचे छापे आदींमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. अशाने परदेशी गुंतवणूकदार येणार नाहीत, असे टीकास्त्र समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी सोडले.
उत्तरप्रदेशात नुकतीच गुंतवणूकदारांची परिषद झाली. त्या परिषदेचा आधार घेऊन उत्तरप्रदेशात 40 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक येणार असल्याचा दावा सत्तारूढ भाजपकडून केला जात आहे. त्या दाव्याची खिल्ली अखिलेश यांनी पत्रकारांशी बोलताना उडवली. भाजप जनतेला केवळ स्वप्न विकत आहे. परिषदेसाठी गुंतवणूकदार आले आणि निघून गेले. गरिबांच्या घरांवर बुलडोझर चालवले जात असल्याची छायाचित्रे संपूर्ण जगाने पाहिली.
प्रसारमाध्यमांना धाकदपटशा दाखवला जात आहे. अशावेळी जगभरातील लोक आपल्या देशात गुंतवणूक करतील अशी अपेक्षा करता येऊ शकेल काय, अशी विचारणा त्यांनी केली. इंधनांच्या चढ्या दरांमुळे भाज्या आणि खाद्यपदार्थ महागले आहेत. महागाईबरोबरच बेरोजगारी सध्या सर्वोच्च पातळीवर आहे, अशा शब्दांत अखिलेश यांनी भाजपला लक्ष्य केले. तसेच 2024मध्ये भाजपला जरूर धडा शिकवा असेही त्यांनी म्हंटले आहे.