कराड -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले आहे. मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी सोमय्या हे रविवारी (दि. 19) रात्री मुंबईतून कोल्हापूरला निघाले होते. त्यांना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कराड येथे कोल्हापूर व सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईपासून पोलीस सोमय्यांच्या संपर्कात होते. त्यानंतर ते कराडमध्ये थांबायला तयार झाले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते रेल्वेने कोल्हापूरला निघाले होते. या संदर्भात मुश्रीफ समर्थकांनी सोमय्यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्ये केली होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस काढून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केला होती. त्यानंतरही रविवारी रात्री सोमय्या मुंबईतून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला रवाना झाले होते. त्यांना सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास कराड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या विनंतीवरून सोमय्या रेल्वेतून कराडमध्ये उतरले. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत. त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, असे सोमय्यांनी पत्रकारांना सांगितले. ओगलेवाडी (कराड) रेल्वेस्थानकावर दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर सोमय्यांना बंदोबस्तात कराडच्या विश्रामगृहावर नेण्यात आले.
साधारणतः अशी घटना होते, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देतात. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, नाही. मला माहीत नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. याबाबत जो काही निर्णय घेतला, तो गृहमंत्रालयाने घेतलेला, ही वस्तूस्थिती आहे. या कारवाईबाबत शरद पवारांच्या हस्तक्षेपाचा अजिबात प्रश्न उद्भवत नाही. रविवारी जी परिस्थिती कोल्हापुरात जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली. ती त्यांनी गृहविभागाला कळवली. त्यानंतर दोन्ही पक्ष समोरा-समोर आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून ही कारवाई करण्यात आली.
दिलीप वळसे-पाटील , गृहमंत्री
देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले असेल की, एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. यासाठी कारण सांगितले जाते की, तिथे ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतात, अशाप्रकारची कायदा-सुव्यवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे एकूणच जे काही चालले आहे, ते भयानक आहे.
देवेंद्र फडणवीस , विरोधी पक्षनेते