मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवारावर हल्लाबोल केला आहे. मालमत्तेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती लपविल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये आता पुन्हा आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांने २०१४ साली अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील कोर्लेई येथील जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या. मात्र २०२० पर्यंत या जमिनींवरील मालमत्ता आपल्या नावावर चढविल्या नाहीत. बेनामी मालमत्ता म्हणून सहा वर्षे त्यांनी वापरल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
दरम्यान निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी जमिनीवरील १९ मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, ही माहिती लपविण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अलीबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना हे आरोप केले आहेत.
अन्वय नाईक यांच्याकडून ठाकरे आणि वायकर परिवाराने २१ मार्च २०१४ ला कोर्लई येथील ३० जमिनी खरेदी केल्या. या जमिनींवर ५५० चौरस फुट पासून २५०० चौरस फुट पर्यंतची १९ घरे आहेत. शासनाच्या रेडीरेकनर दरानुसार या जमिनीचे मुल्य पाच कोटी २९ लाख येवढे आहे. मात्र ही घरे १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत ग्रामपंचायतीत दिवंगत अन्वय नाईक यांच्या नावावरच होत्या. शिवाय ही घरे नावावर करून घेण्यासाठी ठाकरे आणि वायकर परिवाराने अर्ज केला नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खरेदी केलेल्या १९ मालमत्तांचा उल्लेख दिसत नसल्याचे सोमैय्या यांनी यावेळी सांगितले. तसेच या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.