नवी दिल्ली : सध्या केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात अनेक मुद्द्यांवरून शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यातच आता ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी यासंदर्भात एक विधान केले आहे. ज्यात त्यांनी कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.सर्वोच्च न्यायालयावर प्रश्न उपस्थित करून किरेन रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडलीये, असे म्हणत साळवे यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरकारकडून निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांची नियुक्ती झाल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. न्यायालयाने सरकारकडे या नियुक्तीसंदर्भातील संपूर्ण तपशील मागितले होते. तसेच, 24 तासांपेक्षा कमी कालावधीत हा निर्णय कसा घेतला गेला, अशी विचारणाही केली होती. तर याला उत्तर देताना सरकारने, यापूर्वीही असं घडलं आहे आणि कोणत्याही नियमांच उल्लंघन केलं गेलेलं नाही.
तर आता या सर्व प्रकारावर हरीश साळवे यांनी कायदामंत्र्यांबद्दल एक विधान केले आहे. किरेन रिजिजू यांनी लक्ष्मणरेषा ओलांडल्याचे म्हटले आहे. बार अँड बेंचच्या म्हणण्यानुसार, हरिश साळवे म्हणाले की, “मला वाटतं की, कायदामंत्र्यांनी जे वक्तव्य केलंय, ते बोलून त्यातून लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. जर कायदामंत्र्यांना असं वाटत असेल की, सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं आणि कायद्यात सुधारणा करण्यासाठी सरकारच्या दयेवर अवलंबून राहायला हवं, तर माफ करा, हे पूर्णपणे चुकीचं आहे.” तसेच आपल्या भाषणादरम्यान साळवे यांनी राजद्रोह कायद्याचाही उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं राजद्रोह कायदा रद्द करावा, असं म्हटलं आहे. कारण त्यांच्या मते हा वसाहतवादी कायदा होता, जे व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले असता कायदामंत्र्यांनी उत्तर दिले होते. एका कार्यक्रमादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिजिजू म्हणाले होते की, “हा कसला प्रश्न आहे? तसे असेल तर कॉलेजियम न्यायाधीशांची नावं कशी निवडते, असा प्रश्नही पुढे लोक विचारू शकतात. यावरही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालाद्वारे बोललं पाहिजं आणि अशा प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे.”