परवा भारताच्या महिला क्रिकेट संघांनी अंतिम सामन्यात ,यजमान आस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळत असताना विश्वचषक गमावला त्यानंतर एका वृत्तवाहिनीवर महिला दिनाच्या दिवशी, भारतीय महिला संघाचा लाजिरवाणा पराभव…अशी हेडलाईन दिली होती. मग काही वेळानंतर त्यांनी स्टुडिओत बसून त्या पराभवाची कारणं शोधायचा सुद्धा स्वतःच प्रयत्न केला.
मुळात स्पर्धा किव्हा कोणताही सामना म्हंटल तर जित आणि हार हे समीकरण येतंच. पण मग हा पराभव लाजिरवाणा का बरं वाटावा ? तर मुख्यतः त्याची तीन कारणं असू शकतात.
महिलादिनी महिलांचा पराभव झाला म्हणून…केवळ क्रिकेट या खेळाला दिले जाणारे अनन्यसाधारण महत्व..
किव्हा मग या दोन्ही मुद्द्यांकडे पहायची न बदललेली मानसिकता.
वो स्त्री है वो कुछ भी कर सक्ती है… हे दरवेळी लागू पडतंच अस नाही ..कारण समोर विजेता ठरलेला संघ सुद्धा महिलांचाच होता ; त्यामुळे महिला दिन असला तरी या पराभवात लाजिरवाण वैगरे काही आहे असं वाटून घ्यायचं करण नाही.
आजही बुद्धिबळातील देशातील पहिली ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी अनेकांना माहीत नाही. अनेकांना मानिका बात्रा नेमका कोणता खेळ खेळते हे माहीत नाही.हिमा दासकडे सहानुभूतीच्या नजरेतून पाहिलं जातं,मेरी कॉम किंव्हा फोगट भगिनींवर चित्रपट येतो त्यामुळे त्या आम्हाला माहित असतात, मिताली राज ही दुर्दैवाने अंतर्गत राजकारणामुळे जास्त प्रसिद्ध होते.
मुळातच क्रिकेट मधला पराभव म्हणजे लाजिरवाणा आणि विजय अभिमानास्पद मग तो महिलांचा असेल किंव्हा मग पुरुषांचा हे समीकरण रुजत गेलं , आणि मग ऑलम्पिक मध्ये ज्यावेळेला पदकांचा दुष्काळ पडतो त्यावेळी आम्हाला काहीच नाही वाटत.. मग इथून त्या मानसिकतेचा मुद्दा सुरू होतो.
म्हणजे लहानपणापासून आम्ही आमच्या मुलाला क्रिकेटची बॅट – बॉल देतो इतर कोणत्याही खेळाची ओळखच करून देत नाही. त्यामुळे मुलानी सचिन व्हावं ही अपेक्षा तर असतेच ,नंतर स्वप्न भंगतं आणि मग TV वरच्या सर्व सचिनला त्याच काय चुकलं हे आम्ही सांगतो TV मधूनच. तर त्याचवेळी घरातल्या मुलीला भातुकलीचा डाव मांडून दिला जातो. पण ती कधीतरी भावाला सचिन बनवण्यासाठी साठी आणलेली बॅट हातात घेते आणि कधी स्मृती तर कधी हरमनप्रित होऊन मैदानात उतरते.
अर्थात त्या बॅट च्या ऐवजी मुलाला विश्वनाथन बनण्यासाठी बुद्धिबळ आणला तर ती सुद्धा विजयालक्ष्मी बनते ,त्याला लीयेंडर बनण्यासाठी टेनिस रॅकेट आणली तर ती सानिया बनतेच की ,पण ज्यावेळी केवळ या गोष्टी घरी फक्त तिच्यासाठी येतात त्यावेळी तिचा प्रत्येक पराभवसुद्धा अभिमानास्पद वाटायला लागतो आणि जिच्या घरात अस काहीच कधीच येत नाही ना ती परिस्थितीशी झगडून आणि सहानुभूतीची सर्व कुंपणं पार करून धावत सुटते आपल्या ध्येयाकडे हिमा दास होऊन…….
– राज सुनिल देशपांडे,
कॉलेज रिपोर्टर,
झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग