राजगुरूनगर – खेड तालुक्यात मंगळवारी (दि. 15) व बुधवारी (दि. 16) “जनता कर्फ्यू’करून “आपले कुंटुब आपली जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत “घर टू घर’ सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र, हा कर्फ्यू तथा मोहीम पुढे ढकलून शुक्रवारी (दि. 18) व शनिवारी (दि. 19) करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
खेड तालुक्यात करोनाबाधित व्यक्तींची संख्या पाच हजरापर्यंत पोहोचली आहे. मृतांची आकडेवारी वाढत असल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी व बाधित व्यक्ती शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.तालुक्यातील तीन नगरपरिषदामध्ये व ग्रामीण भागात ज्या गांवात 15 पेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. अशा सर्व गावांची घरटी कुंटुब सदस्यांची तपासणी केली जाणार जाणार आहे.
आमदार दिलीप मोहिते व प्रांताधिकारी तेली म्हणाले की, वर्षभर काम करणाऱ्या बळीराजाचा एकच सण बैलपोळा असतो तो गुरुवारी (दि. 17) असल्याने दोन दिवस त्याची तयारी करावी लागते, तसेच व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार मंगळवारी (दि. 15) व बुधवारी (दि. 16) ऐवजी आता शुक्रवार (दि. 18) व शनिवारी (दि. 19) तारखेला सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मोहीमे अंतर्गत तालुक्यातील राजगुरूनगर, आळंदी आणि चाकण नगरपरिषद हद्दीसह उर्वरित गावांमध्ये संपूर्ण कुंटुबांची आरोग्य तपासणी केली करण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी वैद्यकीय, सेवा आणि शासकीय कार्यालये वगळता सर्व खासगी अस्थापनासह, बॅंका, भाजी बाजार आणि सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत. तालुक्यात कंपन्यांमध्ये जाणाऱ्या चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर परिसरातील कामगारांना कामावर जाता येणार नाही. ते दोन दिवस त्यांनी घरी थांबण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित कंपन्यांना कळविण्यात आले आहे.
घरी येणाऱ्या सर्वक्षण अधिकाऱ्यांना सहकार्य करावे नागरिकांनी आजार लपवू नये सध्याच्या काळात करोना वाढला असून त्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळणे जिकिरीचे झाले आहे म्हणून करोना होऊ नये यासाठी स्वतःच काळजी घ्यावी. दोन दिवस पाळण्यात येणाऱ्या “जनता कर्फ्यू’मध्ये सर्वांनी घरी थांबून सहकार्य करावे, असं आवाहन आमदार दिलीप मोहिते यांनी केले आहे.
– ,