धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ः नागरिक, प्रवासी त्रस्त
वेल्हे -वेल्हे तालुक्यातील पाबे-खानापूर रस्त्याचे रूंदीकरण व नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या मार्गावर थोपटेवाडी ते कोंडागांव (ता. वेल्हे) पर्यंत 8 किमी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. परंतू हे काम कासव गतीने सुरु आहे. काही ठिकाणी चांगला रस्ता उखडून ठेवल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या रस्त्यावर खोदकामामुळे झालेली प्रचंड धूळ आणि प्रदूषण यामुळे विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे सर्दी, खोकला, दमा तसेच फुप्फुसांचे विविध आजार उद्भवल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खानापूर, पाबे या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी माती तर काही ठिकाणी मुरूम टाकण्यात आला आहे.
या रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त असल्याने दिवसभर धूळ पसरत आहे. खोदलेले रस्ते, रस्त्यावरील खड्डे आणि कासव गतीने सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडी नित्याची समस्या बनली आहे. या समस्यांमुळे वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्यावरील धुळीने शाळकरी मुले, नागरिक, व्यावसायिक, नोकरदार, पर्यटक त्रस्त झाले आहेत.डोळ्यात व तोंडामध्ये धूळ जात असल्याने श्वसनाचे त्रास उद्भवत आहेत. टप्प्या टप्प्याने काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
मात्र संपूर्ण रस्ता फक्त खोदाई करून वाहनचालकांची अडचण निर्माण झाली आहे. यामुळे दुचाकीवरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याचे काम जलद गतीने करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे. धुळीच्या समस्यांमुळे या रस्त्यावर वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत. खोदलेले रस्ते, सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.