पुणे- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणे काठोकाठ भरली असून प्रकल्पात 99.37 टक्के म्हणजे 28.97 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरणे भरल्याने यंदा शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा तर ग्रामीण भागासाठी शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला असून 1 हजार 712 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर खडकवासला धरणातून आजपर्यंत 10.48 टीएमसी इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणांतील पाणीपातळी फक्त 33 टक्के होती. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांतच ही चारही धरणे भरली. त्यानंतर आता विसर्ग सुरूच आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पुणे शहराच्या दृष्टीने खडकवासला प्रकल्पात किती पाणी उपलब्ध आहे. याकडे सर्वांचे लक्ष असते. शहराची तहान याच प्रकल्पातील चार धरणांवर अवलंबून आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर वर्षभर पाण्याचे नियोजन ठरते. कालवा समितीच्या बैठकीत शहरासाठी किती पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागाला किती आवर्तने सोडायची, याचा निर्णय होतो.
धरणात समाधानाकारक पाणीसाठा असल्याने पाणीवाटपाचे नियोजन सोपे होते. यंदा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे भरल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बुधवारी दिवसभरात या चारही धरणात पावसाने विश्रांती घेतली.सध्यस्थितीत पानशेत धरणातून 600 क्युसेक आणि वरसगाव धरणातून 888 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.