जगदीश देशमुख
16 मार्च 2001 रोजी नेल्सन मंडेला यांना भारत सरकारकडून गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला होता. शांततेसाठी अनेकजण काम करत आहेत. तरी जग अशांतच आहे. अशा अशांत जगात शांतता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जग करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी जसा एक झालाय तसाच तो शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध एक व्हायला हवा तरच जागतिक शांतता शक्य आहे. त्याचाच घेतलेला हा परामर्श…
आज जगाला शांततेची किती गरज आहे. हे पुढे काही आकडेवारी दिली आहे ती वाचल्यावर समजेल. 2019 या एका वर्षाचाच आपण विचार करूया आणि त्यातही केवळ दहशतवादी हल्ल्यांचा विचार करूया. जगामध्ये हे दहशतवादी हल्ले किती झाले आणि त्यामध्ये किती निष्पाप दगावले आहेत ते बघा. जानेवारी 2019 मध्ये एकूण दहशतवादी 9 घटना घडल्या. त्यामध्ये एकूण 242 निष्पाप जीव दगावले. फेब्रुवारी- हल्ले 11, दगावले- 310, मार्च- हल्ले 10, दगावले- 266, एप्रिल- हल्ले 10, दगावले- 320, मे- हल्ले 7, दगावले- 60, जून- हल्ले 14, दगावले- 548, जुलै- 9, दगावले- 202, ऑगस्ट- हल्ले 8, दगावले- 152, सप्टेंबर- हल्ले 6, दगावले- 140, ऑक्टोबर- हल्ले 9, दगावले- 139, नोव्हेंबर- हल्ले 13, दगावले- 234, डिसेंबर- हल्ले 11, दगावले- 259.
2019 या एका वर्षामध्ये जगभरातील दहशतवादी घटनांमध्ये दगावल्याची संख्या ही 2 हजार 872 इतकी आहे. जगात वादविवादामधून एकमेकांवर हल्ले करून दगावणाऱ्यांची संख्याही तर लाखोंमध्ये आहे. म्हणजे आज जगाला शांततेची किती गरज आहे. आजच्या लेखामध्ये आपण नेल्सन मंडेलाच्या अनुषंगाने जागतिक शांततेसाठी गांधीविचारासोबतच. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपणही काय करू शकतो हे पाहणार आहोत.
एकमेकांवर दोषारोप न करता समेट घडवून मैत्रीचा हात पुढे करणे, कटुता निर्माण होण्याआधीच त्यावर उपाययोजना करणे व संघर्षाआधीच शांतता प्रस्थापित करणे. या त्रिसूत्रीनुसार मंडेलांनी कारभार केला. जुना इतिहास उगाळत न बसता मार्गक्रमण करण्याचे भान त्यांच्याजवळ होते. धर्म, जात, वर्ण यावर माणसाचे विभाजन न करता सर्वांना समान वागणूक देणारी राज्यघटना ही मंडेलानी दक्षिण आफ्रिकेला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.
आज संपूर्ण जग हे धगधगत्या अग्नीवर उभा आहे. तिसरे महायुद्ध अटळ आहे? काही दिवसांपूर्वी आपण दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यातील वाद बघितलाच आहे. अरबी देशांना तर शांतता हा शब्द काहींनी अनुभवलेला नसावा, अशी स्थिती जगाच्या मध्यभागी असलेल्या भूभागावर आहे. या अशांत भूभागाला दोन महायुद्धांचा कटू अनुभव घेतलेल्या स्वार्थी, अतिमहत्त्वाकांक्षी जगाने खास करून युरोपने वेढले आहे. त्यामुळे यापुढे मानवजात सुखा-समाधानाने जगावी असे वाटत असेल तर जगाला काही उपाययोजना कराव्याच लागतील. त्याची सुरुवात प्राथमिक शाळेपासून करून मुलांना लहानपणापासूनच शांततेचे धडे गिरवायला लवावे लागतील. जगाच्या प्रत्येक देशाच्या शाळेच्या इतिहासामध्ये युद्धाचे, लढायाचे धडे न देता या युद्ध आणि लढायामुळे झालेले नुकसान यावर जास्त भर दिला पाहिजे आणि शांतता कशी टिकेल यावर धडे पाहिजेत. शांतता प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तीच्या विचारावर धडे हवेत. प्रत्येक नागरिकांची शांततेसाठी मानसिकता बनवायला पाहिजे.
सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर “नाटो’सारख्या लढाऊ सैन्यासोबत (मर्यादित) संबंध वाढवणे उपयुक्त ठरेल. तसेच गुप्तहेर संस्था आणि माहिती अन्वेषकांकडून मिळालेल्या माहिती आणि सूचनांवर योग्य पावले उचलणे सरकारचे कर्तव्य आहे. या संघटनांच्या लढायाला मुख्यत: बौद्धिक स्तरावर सामोरे जाणे गरजेचे आहे. धर्मगुरू, नेते, अभिनेते, सामाजिक संस्था इत्यादींची मदत घेऊन सरकारने तरुणांमध्ये मार्गदर्शन करून याबाबत जागरूकता आणणे जास्त उपयोगाचे ठरेल. इंटरनेटवर फिल्टर सिस्टीम आणि अशा प्रकारच्या सुरक्षा प्रणालींची व्यवस्था सरकारलाच करावी लागेल. दहशतवाद विरोधी कायद्यांचे सक्षमीकरण करून त्यातील दंडात्मक तरतुदींचे दंड कठोर आणि गतिमान करणे अत्यंत आवश्यक आहे. पश्चिम आशियाई राष्ट्रांच्या शासन व्यवस्थेत सुधार करून तेथील जनतेचा विकास होणे, हे उपाय योजावे लागतील.
वाढते जागतिक तापमान, पर्यावरणाचा ऱ्हास, अनैसर्गिक गोष्टींची निर्मिती या समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. यामुळे असमाधान, अशांतता, अराजकता वाढण्यास खतपाणी मिळत आहे. मानवी जीवनातील शांती-समाधानाचा खरा आनंद लयाकडे जातोय. यासाठी सिकंदराचे उदाहरण सांगता येईल. भले ही घटना काल्पनिक असेल पण त्यातून मिळणारा धडा लाखमोलाचा आहे. सिकंदर जेव्हा जग जिंकत भारतात आला, तेव्हा त्याचे सैन्य प्रचंड आवाज करत जात होते. एका झाडाखाली शांत बसलेला साधू क्षणभरही विचलित झाला नाही. हे पाहून सिकंदर त्या साधूला हलवून जाग करीत म्हणाला, “माझ्या सैन्याच्या प्रचंड आवाजाने तू क्षणभरही घाबरला नाहीस, की व्यथित झाला नाहीस. हे कसे शक्य आहे?’
त्या साधूने शांतपणे त्याला उलट प्रश्न केला, “तू कोण आहेस? कुठून आला? आणि आता कोठे चालला आहे?’
सिकंदर गर्वाने म्हणाला, “मी सिकंदर, जग जिंकण्यासाठी निघालो. जग जिंकत जिंकत आता हा देश जिंकायला आलो आहे.’
साधूने विचारले, “संपूर्ण जग जिंकल्यावर काय करणार आहेस?’
सिकंदर म्हणाला, “काही नाही मी एका झाडाखाली शांत बसेन.’
त्यावर तो साधू शांतपणे हसत त्याला म्हणाला, “सध्या मी तेच करतो आहे.’
जोपर्यंत या जगातला प्रत्येक नागरिक हे संपूर्ण जग माझे घर आहे, अशा चष्म्यातून जगाकडे पाहात नाही, तोपर्यंत जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक शतकात महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, लिंकन, नेल्सन मंडेला अशा महामानवांच्या जन्माला येण्याची वाट पाहण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही.