माळशिरस परिसरातील अनेक स्थळांची पडझड
भुलेश्वर – संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यातील सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणारे माळशिरस (ता. पुरंदर) येथील भुलेश्वर महादेव मंदिर. या मंदिराबरोबरच अजुनही पुरातन शिवमंदिरे आहेत. मात्र या मंदिरांकडे दिवसेंदिवस ग्रामस्थ, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे माळशिरस येथील पुरातन शिवमंदिरे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.
या भागातील काही शिव मंदिरांची पडझड झालेली आहे. तर काही मंदिरांच्या भिंतींमध्ये झाडे उगवल्याने मंदिराच्या भिंती पडल्या आहेत. येथील काही शिवलिंग उघड्यावर आहेत. त्या ठिकाणी त्यांच्याभोवती काटेरी झुडपे उगवली आहेत. याशिवाय मंदिराबरोबरच माळशिरस मधील इतिहासाच्या पाऊलखुणा येथील ऐतिहासिक वाडे यांचे सुद्धा जतन व्हावेत, यासाठी वाडा मालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बऱ्याच दिवसांपासून पडीक असलेल्या या वाड्यांमध्ये काटेरी झुडपे उगवलेली दिसून येतात.
आज सुद्धा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी घराच्या पायाच्या कामाचे उत्खनन करताना जुन्या घरांच्या भिंतींचे अवशेष सापडतात. बऱ्याच ठिकाणी असणारी पांढरी माती या ठिकाणी पूर्वी गाव असल्याचे ओळख पटवून देते. या परिसरास आजपर्यंत बऱ्याच इतिहास तज्ज्ञ, अभ्यासकांनी भेटी दिल्या आहेत. यामध्ये डेक्कन कॉलेजचे अभ्यासक अभिजीत दांडेकर, कुमुद कानेटकर अशा बऱ्याच अभ्यासकांचा समावेश आहे.
ऐतिहासिक स्थळे जतन करण्याची गरज
पुरंदर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लागलेला आहे. परंतु या परिसरातील अनेक स्थळांची पडझड झालेली आहे. त्यामुळे याभागातील ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था झाली आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले तर ही स्थळे पुढील पिढीला प्रेरणादायी ठरतील. त्यासाठी या स्थळे जतन करण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांचाही हातभार लागणे गरजेचे आहे.
माळशिरस गावातील तरुण इतिहासप्रेमी युवकांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक ठेव्याकडे लक्ष देऊन याचे जतन करणे गरजेचे आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी हा सांस्कृतिक वारसा जतन करण्याची गरज आहे. त्यामुळे युवक, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
-दशरथ यादव, ज्येष्ठ साहित्यिक.