योग्य प्रक्रिया न करता पाणी सोडल्याने शेतकरी संतप्त
केडगाव – येथील बेबी कालव्याच्या आवर्तनामधून येणारे फेसयुक्त पाणी नागरिक, जनावरांसाठी घातक ठरत आहे. केडगाव येथील फाटा क्रमांक 22 ला सध्या बेबी कालव्याच्या पाण्याचे रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सुरू आहे. या पाण्याला असणारा हिरवा रंग, त्यामधून येणारा उग्र वास यामुळे हे पाणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मुंढवा जॅकवेल मधून ग्रामीण भागातील हवेली आणि दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बेबी कालव्यामधून आवर्तन सोडण्यात येते. हे पाणी सोडण्यापूर्वी त्यावर योग्य प्रक्रिया करून सोडण्यात यावे असे आदेश पालिका प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. असे असतानाही त्याकडे मात्र प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
सद्यस्थितीत आवर्तनाद्वारे सोडण्यात आलेले फेसाळयुक्त पाणी येत आहे. त्यामधून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी येत आहे.
या दूषित पाण्यावर शेतकरी शेती भिजवून सिंचित करीत आहेत, असे असले तरी पाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने या पाण्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या आरोग्यावर भयानक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय हे पाणी आजुबाजुला असणाऱ्या विहिरी आणि कूपनलिका यामध्ये झिरपून सदर जलस्रोत दूषित होण्याचा धोकाही निर्माण होणार आहे. त्यामुळे कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करावी, अशी मागणी नागरिक, शेतकऱ्यांमधून केली जात आहे.