कतरीना कैफ आणि सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट उद्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारत चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी हे संकेत दिले आहेत. परंतु, कतरीनाच्या नवऱ्यामुलाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.
भारत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कतरीना कैफला प्रश्न विचारण्यात आला कि, भारत देशात कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडते आणि कोणती गोष्ट सुधारण्याची गरज आहे? यावर कतरीना म्हणाली, भारताच्या लोकांकडून मिळालेले प्रेम मला सर्वात जास्त आवडते. आणि शिक्षणावर काम करण्याची गरज आहे. शिक्षण सर्वांसाठी अनिवार्य असले पाहिजे, असे तिने सांगितले. यानंतर कतरिनाला लग्न कधी करणार हा प्रश्न विचारण्यात आल्यावर तिने अली अब्बास जफर यांना पुढे केले. ‘सर्व बुकिंग झाली’ असल्याचे अली अब्बास जफरने सांगितले. यावरून कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी कतरिनाचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्याने ती कोणाशी विवाह करणार यासंबंधी अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहे. तर सलमाननेही विवाहसंस्थेत विश्वास नसल्याचे सांगितले आहे. यामुळे कतरिनाच्या लग्नाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
दरम्यान, भारत चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. यात दोघांचा तरुणपणापासून तर वयोवृद्धचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे.