आळंदी, – संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदी शहरात गुरुवार (दि. 17) पासून भाविकांची आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. बुधवार (दि. 23) पर्यंत इतर वाहनांना बंदी असणार आहे. यापार्श्वभूमीवर आळंदीतील ग्रामस्त आणि भाविकांच्या वाहनांना पास देण्यात येत आहेत. हे पास मिळविण्यासाठी मंगळवारी (दि. 15) ग्रामस्तांनी आळंदी पोलीस ठाण्यात गर्दी केल्याचे दिसून आले.
मुख्य यात्रा कार्तिकी एकादशी रविवारी (दि. 20) तर मंगळवारी (दि. 22) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. दरम्यान, दि. 19, 20, 21, 22 या दिवसांमध्ये आळंदी शहरात भाविकांची मोठी गर्दी असणार आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आपली वाहने योग्य ठिकाणी पार्क करावीत, तसेच बाहेर काढू नये, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.
पिवळ्या आणि गुलाबी रंगाचे पास –
आळंदी पोलिसांकडून यात्रेच्या अनुषंगाने भाविकांचे वाहनांसाठी पिवळ्या रंगाचा तर स्थानिकांचे वाहनांसाठी गुलाबी रंगाचा पास देण्यात येत आहे. हे पास घेण्यासाठी भाविकांना आळंदी पोलीस ठाण्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिकांनी पास मिळविण्यासाठी आळंदी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. पाससाठी ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, कागदपत्रे आवश्यक आहेत.
दरम्यान, जुन महिन्यात आषाढी एकादशी पायी वारी सोहळ्यादरम्यान पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आळंदी शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. कोणाचेही वाहन सोडण्यात येत नव्हते. यावरून स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी पुढील वेळी ओळखपत्र पाहून स्थानिकांना मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे आळंदी यात्रेदरम्यान काही कामानिमित्त प्रवास करावा लागत असल्यास पासची सुविधा देण्यात आली आहे.
हेही वाचा – अतिक्रमण कारवाईतील साहित्य परत मिळणार – मुख्याधिकारी अंकुश जाधव