Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पुण्यात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी युवा सरपंचांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच अयोध्येत होणाऱ्या देखील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाबाबत राज ठाकरेंनी मनसैनिकांना महत्वाचे आवाहनही केले. सध्या या सोहळ्याचे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्त त्यांनी महाराष्ट्रभर महाआरत्या करा, आनंद साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “22 जानेवारीला राममंदिर होत आहे, बाकी भानगडीत पडू नका. इतकेच सांगेन की कार सेवकांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. तेव्हा मनसेच्या सैनिकांनी कार सेवकांच्या आनंदात सहभागी व्हायचे आहे. जिथे जिथे शक्य आहेत तिथे आरत्या किंवा विविध स्वरूपाचे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करा.”
यावेळी त्यांनी ग्रामपंचायत स्वच्छ ठेवण्याचेही आवाहन केले. “मला एकच सूचना करायची आहे गाव स्वच्छ ठेवा. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे लागत नाहीत, इच्छाशक्ती लागते, असे म्हणत ग्रामपंचायत स्वच्छ ठेवा. तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणी काय केलं पाहिजे काय नाही केले पाहीजे हे तुम्हाला कळंत. निधी वापर कसा करायचा तो आणायचा कसा हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज पहिला टप्पा पार केला पुढे आमदार खासदार व्हाल पण आता स्वप्न बघू नका,” अशी मिश्कील टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.