मुंबई – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमालगतच्या सहा जिल्ह्यांतील कामगारांना पगारी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्यशासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक देखिल जारी करण्यात आलं आहे. 10 मे रोजी एकाच टप्यांत कर्नाटक विधानसभा निवडणुकाचे मतदान पार पडणार आहे.
त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातल्या सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतील ज्या मतदारांची नावे कर्नाटक राज्यांत आहेत, अशा मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. तर काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. दक्षिण भारतातील एकमेव कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. तसेच 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.