बेंगळुरू – यावर्षी म्हैसूरचा राजा नलवाडी कृष्णराजा वाडियार, राणी लक्ष्मीबाईंप्रमाणे ब्रिटीशांशी लढणाऱ्या राणी चेन्नम्मा आणि बेंगळुरूचे संस्थापक नादाप्रभू केम्पेगौडा यांच्या जीवनाचे प्रदर्शन करण्यासाठी कर्नाटक झलक प्रस्तावित करण्यात आली होती.
मात्र, केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये कर्नाटकच्या चित्ररथाचा समावेश न करून सात कोटी कन्नडिगांचा अपमान केला आहे, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे.
दुसरीकडे, केंद्र सरकारने सांगितले आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणाचा चित्ररथ घ्यायचा किंवा नाही याचे सर्वाधिकार लष्कराकडे असतात. त्यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करु शकत नाही.
सिद्धरामय्या म्हणाले की, ‘गेल्या वर्षीही कर्नाटकला अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले होते, तेव्हा केंद्र सरकारने सुरुवातीला कर्नाटकच्या चित्ररथाला समाविष्ट करण्यास नकार दिला होता, मात्र नंतर विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या चित्ररथाचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली होती.
त्यामुळे यावेळी केंद्र सरकारने कन्नड जनतेचा अपमान करण्याचा सिलसिला पुन्हा सुरू ठेवला आहे. या अन्यायावर भाजपचे कर्नाटकचे खासदारही गप्प आहेत हे दुर्दैवी आहे. ते नरेंद्र मोदींचे बाहुले बनले आहेत.
सिद्धरामय्या यांच्या पोस्टवर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘हा मोदींचा बदला घेण्याचा मंत्र आहे. मे २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव ते अजूनही विसरलेले नाहीत. मोदी खरं तर एक लहान माणूस आहेत.