बेंगळुरू – कर्नाटकात कॉंग्रेस सरकारमध्ये (Karnataka government) सर्व काही सुरळीत चाललेले नाही. जानेवारीनंतर सिद्धरामय्या सरकार (Siddaramaiah Govt) कायम राहणार नसल्याचा दावा केला जात आहे. भाजप आमदार बसनगौडा आर पाटील (BJP MLA Basangowda R Patil) यांनी हा दावा केला आहे. बसनागौडा म्हणाले की, 45 आमदार त्यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. आम्ही मुख्यमंत्री होणार असताना विरोधी पक्षनेत्याची नेमणूक कशाला करायची, असेही ते म्हणाले.
बसनगौडा पाटील म्हणाले की, कॉंग्रेस सरकारने बी के हरिप्रसाद यांच्या ज्येष्ठतेला महत्त्व दिले नाही, त्यामुळे ते दुःखी आहेत. बीके हरिप्रसाद यांनी सिद्धरामय्यांबद्दल जे सांगितले ते त्यांची अंतर्गत बाब आहे. मात्र जानेवारीनंतर हे सरकार टिकणार नाही, हे या सर्व घडामोडींवरून दिसून येते.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांना सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे बीके हरिप्रसाद संतापले असल्याचे बोलले जात आहे. आता त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून, त्यामध्ये ते ओबीसी समाजाच्या सभा घेत आहेत.
सभेदरम्यान हरिप्रसाद हे उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात (Chief Minister Siddaramaiah) वक्तव्य करत आहेत. सिद्धरामय्या यांनी याबाबत पक्षाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्याकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. त्याचवेळी कर्नाटक कॉंग्रेसमध्ये आणखी तीन उपमुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे.