-माधव विद्वांस
महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती.
त्यांचा जन्म त्यांचे आजोळी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील. त्यांचे पूर्वज कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडब्रिदी गावातून ऐतवडे जि. सांगली येथे आले.
कालांतराने त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली. त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्या सतत बदल्या होत असत. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी, विटा या गावी झाले.
विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खासगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रजीचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना कोल्हापूर येथे जावे लागले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती व राजाराम हायस्कूलमध्ये ते शिक्षण घेऊ लागले. तेथे भाऊरावांना छत्रपती शाहू महाराज यांचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांच्या पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्या मनावर ठसला. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.
सामाजिक प्रबोधन व साक्षरता ही उपेक्षितांसाठी आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. अनिष्ट प्रथा आणि चालीरीतींना पायबंद घालण्यासाठी सर्वांसाठी शिक्षण असावे या विचारांनी शिक्षणप्रसाराचे ध्येय त्यांनी डोळ्यांपुढे ठेवले. काही काळ त्यांनी विमाएजंट म्हणूनही काम केले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात तसेच सातारारोड येथील कूपर कारखान्यात काम केले. मात्र, व्यवस्थापनाबरोबर कामगारविषयक धोरणामध्ये मतभेद झाल्याने त्यांनी तेथील काम सोडले.
4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला भरीव आर्थिक मदत दिली. कालांतराने वर्ष 1924 मध्ये या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. या कामासाठी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकले. या वसतिगृहाचे वर्ष 1927 मध्ये महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते “श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस’ असे नामकरण झाले.
सर्व जातीधर्माची मुले बंधुत्वाने एकत्र राहतात, एकत्र जेवतात व एकत्र काम करून स्वावलंबनाने शिक्षण घेतात हे पाहून गांधीजीही भारावले. गांधीजीप्रणीत हरिजनसेवक संघाकडून या वसतिगृहाला 1933 पासून दरसाल पाचशे रुपये मदत मिळू लागली. मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी “कमवा व शिका’ ही योजना सुरू केली. योग्य शिक्षक घडविण्यासाठी 1935 मध्ये “महात्मा फुले अध्यापक विद्यालय’ त्यांनी सुरू केले.
वर्ष 1959 मध्ये त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रपतींकडून “पद्मभूषण’ हा किताब मिळाला. पुणे विद्यापीठाने “डी.लिट.’ ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव केला. जनतेने पूर्वीच त्यांना “कर्मवीर’ ही उपाधी बहाल केली होती. 9 मे, 1959 रोजी त्यांचे निधन झाले.