कर्जत – मंदी… मंदी… आणि फक्त मंदी… कुठेही जा एकच शब्दकानी पडतो आणि तो म्हणजे मंदी… करोनामुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय, कंपन्या मंदीच्या खाईत लोटल्या गेल्या… याचा थेट परिणाम तेथे काम करीत असलेल्या कामगारांवर झाला आहे. अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. बांधकाम व्यवसायालाही अवकळा आली असल्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या नाका मजुरांना सुद्धा हाताला काम मिळेनासे झालेय. त्यामुळे हा नाका मजूर दिवसभर अर्धचंद्र भाकरीच्या प्रतीक्षेत कोणी ठेकेदार येईल आणि आपल्याला कामावर नेईल… या आशेने तासन्तास वाट पाहत बसल्याचे असल्याचे केविलवाणे चित्र नजरेस पडत आहेत.
ज्या काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा लोकल प्रवासी सेवा बंद असल्याने कंत्राटी कामगारांना कामावर जाणे शक्य होत नाही आणि ज्यांच्याकडे थोडीफार “पुंजी’ होती त्यांनी मनातील लाज लज्जा, संकोच बाजूला सारत मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा जमेल ते व्यवसाय करण्यास सुरवात केली आहे.
कोणी “टीपॉय’वर मक्याचे कणस विकायला घेऊन बसलाय, तर कोणी भाज्या, कांदे बटाटे तर काहींनी कटलरी साहित्य. मात्र करोनाच्या काळात बहुतांश नागरिकांचे खिसे रिकामे झाल्याने खरेदीला जोर नाही. नागरिक जे फारच गरजेचे आहे, तेच माफक प्रमाणात खरेदी करीत आहेत. त्यामुळे बहुतांश व्यासायिकांना दिवस दिवस ग्राहकांच्या प्रतीक्षेत घालवावा लागत आहे.
महिलांनीही ओलांडला उंबरा…
करोनामुळे खालावलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक महिलांनी कधी नव्हे, तो घराचा उंबरा ओलांडत छोटे व्यवसाय सुरू केले. तर काहींनी घर बसल्या कपडे आदी वस्तूंची ऑनलाइन विक्री चालू केली आहे. तसेच घरबसल्या गृहउद्योग सुरू केले आहेत. या माध्यमातून त्यांना चार पैसे मिळून कुटुंबाला हातभार लागत आहेत.
भरल्या पोटी सल्ल्यांची मालिका…
म्हणे आता करोनाबरोबर जगायला शिकलं पाहिजे… म्हणजे नक्की काय.. आज प्रसारमाध्यम असो की अन्य इंडस्ट्रिज. हे गेल्या सहा महिन्यांत उत्पन्न घटले म्हणत कामगारांना कमी करीत आहेत, तर काही कंपन्या पगारात कपात करीत आहेत. तर काही ठिकाणी कित्येक कर्मचारी तसेच कामगारांना पगारच दिला गेलेला नाही. ही शोकांतिका आहे. तर काही जण म्हणतात कर्म करा… फळाची अपेक्षा करू नका. आताच्या या कलयुगात हे शक्य आहे का असा उपरोधिक सवाल नागरिक करीत असून, आम्हा हातावर पोट भरणाऱ्यांची व्यथा या धनिकांना काय समजणार अशी खंत व्यक्त होत आहेत.