नवी दिल्ली – भारतीय कर्णधार विराट कोहली याला अपयश जरी आले असले तरी लगेच त्याच्यावर टीका करणे बरोबर नाही. कोहलीने नेटमधील सरावात आपल्या चुका सुधारण्यावर भर दिला पाहिजे तरच तो पुन्हा एकदा यश मिळवेल, असा सल्ला भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीला दिला आहे.
दरम्यान, धावांचा भुकेला, सातत्यपूर्ण फलंदाज, भारतीय फलंदाजीचा कणा, रनमशीन अशा विविध नावांनी गौरविण्यात येत असलेल्या कर्णधार विराट कोहली याला न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेत अपयशाचा धनी व्हावे लागले.
कसोटी मालिकाच नव्हे तर टी-20, एकदिवसीय आणि कसोटी या पूर्ण न्यूझीलंड दौऱ्यात कोहलीने केवळ एकच अर्धशतकी खेळी केली आहे. गेल्या 21 डावांत कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक फटकावलेले नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीने 21 धावा केल्या होत्या. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 75 तर 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 105 धावा कोहलीच्या नावावर आहेत. या आधी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध 136 धावांची खेळी केली होती.