उत्तम पिंगळे
हौसेला मोल नसते असे म्हणतात आणि बऱ्यापैकी ते खरेही आहे. आपल्याला अशी अनेक उदाहरणे पाहता येतात. अलीकडे पाहाल तर कुठे विमानात विवाह, कुठे पाण्याखाली विवाह, कुठे हिमशिखरांवर विवाह हौसेखातर होत असतात. आमच्या माहितीतल्या एकाने जंगलात विवाह केला व येणाऱ्या निमंत्रित प्रत्येकास एक एक रोपटे दिले. तर सांगायचा मुद्दा हाच की हौसेला मोल नसते आणि शेवटच्या प्रकारात तर पर्यावरणाच्यादृष्टीने ते चांगलेच होते. कुणी लग्नात परदेशी खाण्याचे पदार्थ बनवतो. मध्यंतरी महाराष्ट्रातील एका नेत्याने चक्क विहिरीत सरबत बनवले होते. तर हौसेला मोल नसते पण हौसेला मोल हे लागते मग ते आर्थिक असो, मदतीचे असो किंवा धैर्याचे असो असे प्रकार आहेत.
सध्या आपण फक्त आर्थिक बाबतीतच पाहू. आपण पाहतो आपल्याकडे प्रत्येकाची आर्थिक ऐपत वेगवेगळी असते. मग हौस आणि ऐपत यांची सांगड घातल्यावर आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आढळतात. पहिली म्हणजे हौस नाही आणि ऐपतही नाही. म्हणजे मला अमुक हवेच ही हौस असते (आवड नाही). व्यक्तिगत आवड ज्यावेळी लोकांना दाखवून मिरवायची असते त्याला हौस म्हणतात. हौस नसलेल्या व्यक्तीला ती कदाचित ऐपत नसल्यामुळेही नसू शकते. अशी व्यक्ती अलिप्त असून मग “आपण बरं आपलं काम बर’. दुसरी व्यक्ती म्हणजे हौस आहे आणि ऐपतही आहे. मग सुरुवातीला सांगितले आहे असे प्रकार होत असतात. मग अशी व्यक्ती जर पूर्वी त्याला जमलं नसेल तर आपली हौस आपल्या मुलाबाळांकडून करवून घेते व परिस्थिती चांगली असल्याने ते त्यांची हौस भागवतात. मग असे लोक मुलांना लगेच टू व्हीलर किंवा कॉलेजात फोर व्हिलरही देतात कारण त्यांना ते सहज परवडते.
आता तिसरा प्रकार जेथे ऐपत आहे पण हौस नाही त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींना कंजूष समजले जाते. एवढा पैसा असून साधे लग्न लावले किंवा एवढा शेठ असून कधी विमानाने गेला नाही, असे म्हटले जाते. कधी ते विमानात गेले नाही मग पुढची पिढी हौशी असते. घरात सर्वत्र एसी व सतत विमानाने प्रवास चालू असतो. अशातच त्या मूळ दाम्पत्यापैकी एखादी व्यक्ती हयात नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्याची सतत सल टोचून राहते की आपण विमानाने त्या व्यक्तीला नेले नाही व त्यामुळे पुढे कधीही विमानाने ती व्यक्ती जात नाही. कितीही पैसा असला तरी अवांतर हौसमौज भागवत नाही.
आता शेवटचा प्रकार म्हणजे हौस आहे पण ऐपत नाही. मग या व्यक्तीची कसरत होत असते. कारण बडेजाव मिरवायचा असतो. मग खोटे दागिने घालून भागवणे. कारण हल्ली नकली दागिनेही हूबेहूब बनू लागले आहेत. कित्येकदा भरजरी उसने कपडे आणूनही बडेजाव मिरवत असतात. कारण ऐपत नसली तरी हौस असते. काही वेळा तर अशा व्यक्ती मग आपली हौस भागवण्याकरता पैसा वाममार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात.
अर्थात, सर्वच जण असे करत नाहीत. अशा लोकांना मग सतत खोटे बोलावे लागते. हळूहळू लोकांनाही ते समजते मग ती व्यक्ती विश्वासार्ह राहात नाही. जुन्या लोकांनी सांगितले आहे की, सर्व सोंग आणता येतात पण पैशाचे नाही. तसेच पुढे समजही दिली आहे की अंथरुण पाहून पाय पसरावे. उगाच ऐपत नसेल तर मोठ्या अपेक्षा बाळगू नयेत म्हणजे खोटेपणा करण्याची गरजच भासणार नाही.