बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या कंगनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाहीत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘धाकड’ हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. सध्या ती जावेद अख्तर यांच्याशी संबंधित एका मानहानीच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. दरम्यान कंगनाने जावेद अख्तरबद्दल असे काही म्हटले आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
जावेद अख्तर यांच्यावर आरोप
कंगना चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता की हृतिक रोशन आणि कंगना बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय होते. दोघांचे काही ईमेलही लीक झाले होते. यावरून बराच वाद झाला होता. आता हृतिक रोशनशी संबंधित या बातमीत एक नवीन अपडेट आले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व जावेद अख्तर यांच्याबद्दल कंगनाने म्हटले आहे की, त्यांनी मला हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली होती.कंगनाने ह्रितिक प्रकरणामध्ये अख्तर यांचं नाव घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. या आधी जावेद अख्तर यांनी कंगना राणौतवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण
बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येत त्याचे नाव ओढले गेल्याचे तक्रारीत सांगितले होते. तेव्हापासून हे प्रकरण सुरू आहे. नुकतीच कंगना तिसऱ्यांदा कोर्टात हजर झाली.हे प्रकरण दीर्घकाळ चालणार असल्याचे दिसते.