छिंदवाडा – मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री कमल नाथ (Kamal Nath) यांच्या कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य जवळपास ४५ वर्षांपासून इथून सत्तेत आहे. त्यामुळे छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला आहे. आता त्यांचा मुलगा नकुल नाथ काँग्रेसचा उमेदवार आहे. पण छिंदवाड्यातील नागरिक कमलनाथ कुटुंबावर नाराज आहेत. ते म्हणतात की या लोकांना त्यांच्या कुटुंबाचे कल्याणच महत्त्वाचे वाटते. इथे विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी कमल नाथ यांनी एकही कंपनी सुरु केली नाही.
एका मतदाराने सांगितले की, छिंदवाडामध्ये २०१४ पासून कोणताही विकास झालेला नाही. कमलनाथ यांनी छिंदवाड्यात १० वर्षे काहीही केले नाही. आता परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळेच इथल्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेस आणि कमलनाथ दोघांनाही सोडले आहे. आता येथे काँग्रेसला विजय मिळणे कठीण आहे. ही जागा भाजप जिंकत आहे.
एका तरुण मतदाराने सांगितले की, छिंदवाड्यातील सर्वात मोठे प्रश्न बेरोजगारी आणि विकास आहेत. जो विकास होत आहे तो फक्त केंद्र सरकारच्या योजनांमुळे होत आहे. स्थानिक पातळीवर कोणतेही काम होत नाही. आजपर्यंत छिंदवाडा येथे विद्यापीठ स्थापन झालेले नाही. ते केवळ एका खोलीत सुरू आहे.
जेपी इंजिनीअरिंग कॉलेज सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, ५५ एकर जागा भाडेतत्त्वावर घेतली होती, मात्र आजही एक वीटही रचली नाही. सिंचनासाठी निधी आला तेव्हा ५९६ कोटी रुपये आगाऊ दिले, पण काहीही काम झाले नाही. एका तरुणीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, माझ्यात काहीही करण्याची ताकद नाही, असे आमचे खासदार म्हणतात. त्यामुळे आता केंद्रात ज्यांचे सरकार सत्तेवर आहे त्यांनाच खासदार बनवू.
इथे एकच कुटुंब भरभराटीला आले –
दुसरा तरुण मतदार म्हणाला की, आम्हाला वाटले होते की, कमलनाथ जिल्ह्यासाठी काहीतरी करतील, परंतु आता आम्हाला समजून चुकले आहे की, कमलनाथयांना फक्त आपल्या मुलाची चिंता आहे, इतर कोणाची नाही. त्यांच्या स्वत:च्या अनेक कंपन्या आहेत, पण आजपर्यंत त्यांनी छिंदवाड्यात स्वतःची कंपनी सुरु केली नाही.