काल प्राध्यापकांना फोन केला व म्हणालो की लॉकडाऊनमुळे सर्वच अवघड होऊन गेले आहे. त्यावर प्राध्यापक म्हणाले की, युरोपात व अमेरिकेत काय चालू आहे ते आपण पाहता ना? मग आपल्याकडे ते आवश्यकच आहे. एक तर आपल्यासारख्या खंडप्राय देशात असे करणे खूप कठीण आहे. कारण अजूनही बरेच लोक सहकार्य करत नाहीत असे दिसते. शेवटी आता त्यांना चौदावे रत्न दाखवावे लागणार असे दिसते कारण कायदा शेवटी सर्वांना सारखाच असायला हवा.
सर मग म्हणाले, पण काल मला एक वेगळा विषय लक्षात आला आहे. आपण पाहतोय की आपल्या आसपासचे बरेचसे धंदे बंद आहेत. कित्येक छोट्याशा कंपन्यांच्या जॉबवर्क आहेत त्या बंद होत आहेत. आपल्याला माहिती आहे की छोट्या व मध्यम उद्योगांचा अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा वाटा आहे. मोठमोठ्या कंपन्यांना ते सुटे भाग पुरवतात व त्यांच्या कंपन्या बंद झाल्यामुळे मोठ्या उद्योगांनाही त्याची झळ लागणार आहे. सर्वच सप्लाय चेन विस्कळीत झाल्यामुळे करोना अटोक्यात आल्यानंतरही उद्योगांची गाडी पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. कृषी उत्पन्नाचे ढीग शेतावरच पडलेले असून वाहतूक व्यवस्था पूर्ण ठप्प आहे.
पण कधी कधी आपत्ती ही इष्टापत्ती असू शकते. आता आपण पाहतो की स्थानिक बाजारपेठेत मास्क, सॅनिटाझर्स व लिक्विड सोप यांचा तुटवडा पडू लागला आहे कारण अचानक सर्वत्र आलेली मागणी. करोना चीनमधून आला यात वाद नाही, वाद आहे चीनने मुद्दाम वाढवला व पसरला की नाही तो. कारण अलीकडची परिस्थिती पाहता असा संशय घेण्यास नक्कीच जागा आहे. तसेच चीन हा विषय युनोमध्येही मांडू इच्छित नाही त्यामुळे गूढ अजून वाढलेले आहे.
अनेक बातम्यांतून असे निदर्शनास येते की बऱ्याचशा देशांनी चिनी उत्पादन घेण्यास नकार दिलेला आहे. अशा वेळी करोना आटोक्यात आल्यावर जागतिक बाजारपेठेचे लक्ष्य भारताकडे निश्चित असेल. एकतर भारतामध्ये मनुष्यबळ कमी खर्चात उपलब्ध आहे. त्यामुळे आपणही उत्पादन तेवढे बनवू शकतो. तसेच अलीकडे चीनमधील मालाचा दर्जाही संशयात आहे. त्यामुळे भारताला निर्यातक्षम माल बनवून या स्पर्धेत उतरण्याची मोठी संधी मिळू शकते. अशा संधीने जरी दार ठोठावले तरी आपण तयार असायला हवे ना? अनेक देशांमध्ये वैद्यकीय सामग्री, अन्नधान्य व विविध नैसर्गिक वस्तूंपासून बनणारे पदार्थ व वस्तू हव्या आहेत, भारत त्या सहज बनवू शकतो.
भारतातील लघु, मध्यम व मोठ्या सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन ही संधी घेणे आवश्यक आहे. एकतर जागतिक बाजारपेठेत भारताची पत निश्चित चांगली असून सचोटी व दर्जा यामध्ये एकदा किंमत ठरल्यावर कोणतीही तडजोड होत नाही. म्हणूनच आपण या दृष्टीने तयार होणे आवश्यक आहे. भारतात ते होण्याकरता प्रथम आपल्याकडील या करोनाचे नियंत्रण आपण करणे आवश्यक आहे. आपल्या स्थानिक उद्योगांचा कारभार पूर्वपदावर आवश्यक आहे. तसे झाले तरच या जागतिक स्पर्धेमध्ये पाऊल टाकू शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर भारताच्याही अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशा वेळी आपण येऊ घातलेली ही संधी इष्टापत्ती म्हणून घेतली तर आपण या जागतिक स्पर्धेमध्ये आपले नवे पाऊल टाकू शकतो. एकतर अलीकडे संपूर्ण जगाचा भारतावरील विश्वास वाढत चालला आहे. त्यामुळे आपण प्रथम देश करोनामुक्त करून आलेल्या आपत्तीचे इष्टापत्तीत परिवर्तन करून घेणे आवश्यक आहे, असे प्राध्यापक म्हणाले.