गायक, अभिनेते कुंदनलाल सहगल यांची आज जयंती. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1904 रोजी जम्मू येथे झाला. त्यांचे वडील अमृतचंद्र हे काश्मीरच्या राजांचे तहसीलदार होते. त्यांची आई केसरबाई त्यांना भजन कीर्तन तसेच गाण्यांच्या कार्यक्रमांना घेऊन जायची, त्यामुळे कुंदनलाल यांना गाण्यांची गोडी लागली. ते लहानपणापासून रामलीला या नाटिकातून काम करीत असत. त्यांचे गायन निसर्गदत्त होते. त्यांना सलमान युसूफ नावाच्या फकीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त त्यांनी कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण घेतले नव्हते. मात्र गझल, ठुमरी व पंजाबी लोकसंगीत यांच्या सरावातून त्यांची गायकी घडत गेली.
शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी रेल्वेमध्ये टाइमकिपर म्हणून काम सुरू केले. त्यांनी हॉटेल व्यवस्थापक म्हणूनही काम केले. त्यानंतर काही काळ रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीच्या सेल्समनचेही काम केले. त्यासाठी त्यांनी खूप भ्रमंती केली. ते एकदा लाहोर येथे आले असता लाहोरच्या अनारकली बाजारामध्ये मेहरचंद जैन यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याबरोबर ते कलकत्ता येथे गेले. त्यावेळी कलकत्ता हे चित्रपट व्यवसायाचे प्रमुख ठिकाण समजले जाई. तेथे त्यांनी एका संगीत मुशाहिरा ऐकला. मेहरचंद यांनी त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहित केले.
1930च्या दशकाच्या सुरुवातीस शास्त्रीय संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक हरिश्चंद्र बाली यांनी आर. सी. बोराल यांच्याशी ओळख करून दिली. बोराल यांनी त्यांच्या प्रतिभेला त्वरित दाद दिली.त्यांनी सहगल यांना बी. एन. श्रीकर यांच्या कलकत्ता येथील फिल्म स्टुडिओ “न्यू थिएटर्स’मध्ये दरमहा रुपये 200ची नोकरी मिळवून दिली. याच वेळी इंडियन ग्रामोफोन कंपनीने बाली यांनी संगीतबद्ध केलेली दोन पंजाबी गाणी सहगल यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली व त्यांचा गायनाचा प्रवास सुरू झाला. वर्ष 1932मध्ये त्यांची “मोहब्बत के आसू’ ही पहिली फिल्म प्रदर्शित झाली. त्याच वर्षी “सुबहाका सितारा’ आणि “जिंदा लाश’ हे चित्रपट प्रदर्शित झाले पण त्यास अपेक्षित यश मिळाले नाही. वर्ष 1933 मध्ये “पूरन भगत’ या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी त्यांची ओळख चंदेरी दुनियेला झाली.
या चित्रपटातील भजने व अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला. त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले ते दिग्दर्शक पी. सी. बरुआंच्या “देवदास’ या वर्ष 1935 मधील चित्रपटाने. या चित्रपटातील “बालम आवो बसो मोरे मन मे’ व “दुख के अब दिन बीतत नही’ यासारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. पहिल्या तीन चित्रपटांसाठी त्यांनी “सहगल काश्मिरी’ हे नाव वापरले त्यानंतर मात्र के. एल. सहगल हे स्वतःचे नाव वापरले. त्यांनी आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 28 हिंदी, 7 बंगाली व 1 तमिळ चित्रपटामधून काम केले तसेच 185 गाणी गायिली. 18 जानेवारी 1947 रोजी त्यांचे जालंदर येथे निधन झाले.