नवी दिल्ली – कबड्डी हा आपल्या देशाच्या मातीतील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली आहे. मात्र, या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला जावा हे आमचे स्वप्नही आहे व प्रयत्न देखील, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजु यांनी व्यक्त केले आहे.
कबड्डी हा भारताचा पारंपरिक खेळ आहे. प्रो-कबड्डी लीगमुळे हा खेळ खरेतर जास्त लोकप्रिय झाला. या खेळाने देशाच्या सीमा ओलांडून युरोप, अमेरिका तसेच पूर्वेकडील देशांतही लोकप्रियता मिळविली आहे. मग अशा वेळी या खेळाचा ऑलिम्पिकमध्येही समावेश व्हावा असे आम्हाला वाटते. त्याच दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. खेळ जरी भारतीय मातीत निर्माण झालेला असला तरीही आज जगातील जवळपास 15 देश हा खेळ खेळतात. त्याची व्यप्ती वाढावी हेच लक्ष्य आहे, असे मत रिजीजु यांनी व्यक्त केले आहे.
प्रो-कबड्डीमुळे तर या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे येत्या काळात या खेळाचा समावेश ऑलिम्पिमध्ये व्हावा हे आमचे प्रयत्न आहेत. या खेळाचा समावेश आशियाइ खेळात यापूर्वीच झालेला असून आता ऑलिम्पिक मान्यताही मिळेल असा विश्वासही रिजीजु यांनी व्यक्त केला.