तिरुअनंतपुरम :– केरळमधील मार्क्सवादी सरकारने कॉंग्रेसचे बडतर्फ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के व्ही थॉमस यांना नवी दिल्लीत विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कॅबिनेट दर्जाही देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सात महिन्यापुर्वीच थॉमस यांना पक्ष विरोधी कारवायांबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले होते.
केरळ सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना थॉमस यांनी म्हटले आहे की, मी पदांच्या मागे जाणारा माणूस नाही. मी माझ्या आयुष्यात राजकारणात अनेक गोष्टी केल्या आहेत. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आता मला लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे, आपल्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण करणार आहोत असे थॉमस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या आधी ज्येष्ठ मार्क्सवादी नेते ए संपत हे केरळ सरकारचे नवी दिल्लीतील विशेष प्रतिनिधी होते.