चेन्नई : गेल्या काही काळापासून दक्षिणात्य अभिनेते रजनीकांत आपला राजकीय पक्ष स्थापन करून राजकारणामध्ये उतरणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्या पार्श्वभुमीवर रजनीकांत यांनी स्पष्टिकरण दिले आहे. आपण मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नाही. मात्र राजकारण स्वच्छ होण्यासाठी जनतेमध्ये उठाव झाल्यास आपण राजकारणात प्रवेश करू असेही त्यांनी म्हटले आहे.
स्वच्छ राजकारण आणि शून्य भ्रष्टाचारासाठी ‘प्रस्तावित’ राजकीय पक्षासाठी तीन-सूत्री फॉर्म्युला रजनीकांत यांनी जाहीर केला. राजकीय बदल आणि सरकार बदल हे आता झाले नाहीत, तर कधीच होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अद्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा नेत्या जयललिता आणि द्रमुक नेते एम करुणानिधी यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमुळे परिवर्तनासाठी अनुकूल काळ आहे.
भ्रष्टाचार, अघोरी शक्ती आणि राजकीय डावपेचांयाबद्दल जनतेला संवेदनशील केले पाहिजे. एखाद्या चळवळीप्रमाणे तरुणांना उठाव करण्यास उद्युक्त केले पाहिजे. जर हा उठाव झाला तर अद्रमुक आणि द्रमुकला बाजूला करून आपला नवा पक्ष सत्ता स्थापन करू शकेल, असे रजनीकांत म्हणाले.
आपण निश्चितपणे राजकारणात प्रवेश करू आणि 2021 च्या विधानसभा निवडणुका लढवू, असे रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी ठामपणे सांगितले होते.