जुन्नर -करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली असून याबाबतची अंमलबजावणी जुन्नर शहर व परिसरात कटाक्षाने सुरू आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे 50 दुचाकींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर ही कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी अजून काही दिवस घरात बंद राहूनच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भाजी, किराणा तसेच शेतीउपयोगी वाहनांसाठीचे इंधन याकरिता प्रशासनाने नागरिकांना सूट दिली आहे. मात्र या सवलतीचा गैरफायदा घेऊन अनेक नागरिक उगीच रस्त्यावर फिरताना आढळत आहेत.
विद्यार्थ्यांवर 188 कलमांतर्गत कारवाई केलेली नसून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली आहे.
नागरिकांनीही भाजी, दूध, औषधे आदी आवश्यक वस्तू आणण्यासाठी जवळच्या दुकानांवर जाताना वाहनांऐवजी पायी जावे किंवा होम डिलिव्हरीने वस्तू घरी मागवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून राज्यातील मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे समाजाच्या हिताचे असून करोनाला रोखण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे.
– आंचल दलाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक.