प्रशांत जाधव
सातारा – करोनाने भारतात पाय पसरले आहेत. अशा परिस्थितींत लोकांनी घराबाहेर न पडता भरउन्हात जनतेच्या सेवेसाठी खडा पहारा देणाऱ्या पोलिसांना सहकार्य करून त्यांच्यातील माणसाला ओळखण्याची गरज आहे. रस्त्यावर उभा राहत आपले कर्तव्य बजावताना “छत्रपतींच्या मावळ्यांनो आपण हरायचं नाही, अशी साद घालत पोलिसांनी लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
संकटाला रोखण्यासाठी एकच चेहरा समोर असतो. तो म्हणजे खाकी वर्दीतला पोलीस! पोलिस कर्मचारी आपले मित्र आहेत, अशा संकटातही जनतेसाठी ते रस्त्यावर आहेत. अन् आपल्याकडून त्यांना केवळ एकच अपेक्षा आहे ती म्हणजे संचारबंदीत विनाकारण घराच्या बाहेर पडायचे नाही. समाजासाठी असो की देशासाठी, पोलिसांचे बलिदान प्रत्येकांनी पाहिले आहे. आई-बहिणींची अब्रू राखणारे पोलिस, तर कधी जनतेच्या रक्षणासाठी राबणारे पोलीस. पोलिसांशी सौजन्याने वागायला हवं, त्यांची ड्युटी त्यांना करु द्या, विनाकारण तंटा न वाढवता आपल्या सुरक्षेसाठी आज ते आपला परिवार सोडून रस्त्यावर उभारलेत याची जाण ठेवणे सद्यस्थितीत गरजेचे आहे.
“कानून के हाथ लंबे होते है’,”दुनिया की कोई जगह इतनी दूर नहीं है जहॉं जुर्म के पांव में कानून अपनी फौलादी जंजीर पहना न सके’, असे कित्येक डायलॉग चित्रपटातील पोलीस अधिकारी बोलतो आणि मग अंगावर काटा उभा राहतो. थिएटरमध्ये शिट्ट्या वाजतात, टाळ्या वाजतात. मग सिंघम आणि “दबंग’मधला चुलबुल पांडे लोकांना आवडतो. पण पोलीस नावाचा रिअल हिरो नेहमीच आपल्या आजूबाजूला दिसतो. तो सिनेमातल्या हिरोसारखं नाचत नाही. तो लाल दिव्याच्या जाणाऱ्या गाडीला सलाम ठोकण्यासाठी उन्हात उभा असतो. तो सिनेमातल्या पोलिसांसारखं प्रेम करताना दिसत नाही. तो 24 तास ऑन ड्युुटी असतो. खाकी वर्दी काढली तर पोलीस नावाचा माणूस आपल्यासारखाच दिसतो, वागतो; पण तरीही त्याच्या आयुष्यात आपल्यासारखं सहज जगणं राहिलेलं नसतं; किंबहुना आपल्यातल्याच काहींमुळे या पोलीस नावाच्या सामान्य माणसाला सहज जगता येत नाही.
लॉकडाऊनच्या काळात फिरू न देणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांना हे माहित नसते, ते डयुटी करत आहेत आपल्या सुरक्षिततेसाठी. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ज्यांच्यासाठी फक्त ब्रीदवाक्य नसून जगण्याचं तत्त्व झालं आहे. ज्यांच्यासाठी “खाकी’ ही फक्त वर्दी नसून कर्तव्य झालं आहे. खाकी वर्दी चढविली की पोलिसाने नातीगोती आणि वैयक्तिक मते विसरून निःपक्षपाती काम केले पाहिजे, अशी रास्त अपेक्षा पोलिसांकडून असते. अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देणे आणि अन्याय करणाऱ्याला तुरुंगात डांबणे, अशी साधारणपणे ही व्यवस्था आहे. मात्र, हे सगळे करणारे पोलीस करोनाच्या मानगुटीवर बसण्यासही सज्ज झाले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत माणुसकीने वागून त्यांच्यातला माणसाला आपल्या रक्षणासाठी अधिक जोमाने तयार करणे गरजेचे आहे.