महापौरांचा आरोप : कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पगार नाही
पिंपरी – पुणे जिल्ह्यातून करोना विषाणू हद्दपार करण्यासाठी करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम या ठिकाणी पालकमंत्र्याच्या पुढाकाराने राज्य शासन, पीएमआरडीए यांच्या माध्यमातून जम्बो रुग्णालयाची उभारणी केली आहे. या ठिकाणी शहरासह जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील करोना रुग्णावर उपचार होत आहेत. मात्र सोयी-सुविधा पुरवूनही शासन व ठेकेदार यांच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णलयाचे वाभाडे निघाले असल्याचा आरोप महापौर माई ढोरे यांनी केला.
जम्बो रुग्णालयामध्ये जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा केली. मात्र त्यांचे वेतन देण्यामध्ये राज्य शासन कमी पडले आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या परिचारिकांनी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आमचे वेतन आम्हाला दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर आज महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी परिचारिकांची भेट घेतली. त्यावेळी महापौर माई ढोरे बोलत होत्या.
महापौर म्हणाल्या, जम्बो रुग्णालयाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले. पालकमंत्री अजित पवार यांनी सुचविल्याप्रमाणे महापालिकेने या जम्बो रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच ऑक्सिजन, आवश्यक औषधे, गोळ्या त्याचप्रमाणे सर्व भौतिक सुविधाही उपलब्ध करुन दिल्या. त्याचप्रमाणे या रुग्णालयावर नियंत्रणासाठी महापालिकेचे डॉक्टर व अधिकारीसुध्दा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इतक्या साऱ्या सुविधा उपलब्ध करुन देऊन देखील शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
शासन व ठेकेदार यांचेतील समन्वयाच्या अभावामुळे जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या या रुग्णालयातील नर्स व इतर स्टाफ यांना पगार मिळाला नाही. त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोट्यावधीचा खर्च करुन सुध्दा कर्मचाऱ्यांचा पगार देणे शासनाला जमलेले नाही. या प्रकारास सर्वस्वी पालकमंत्री व शासन जबाबदार असल्याचा आरोपही महापौर माई ढोरे यांनी केला आहे.
जम्बो रुग्णालयातील ठेकेदार व प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. वास्तविक पाहता या रुग्णालयाच्या निविदेचे काम पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. त्यात शासन व पीएमआरडीएचे लक्ष नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना नेमक कोण उघड्यावर सोडत आहे हे समोर आले आहे. राज्य शासनाच्या या बेफिकिरीमुळे कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. मात्र महापालिका त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते