- राजकारण : आजी-माजी आमदारांमध्ये वाक्युद्ध
- आमदार सुनील शेळके यांना भाजपकडून चर्चेचे खुले आव्हान
- सोळाशे कोटींच्या कामांचा मांडला लेखाजोखा
– राेहिदास हाेले
पिंपरी – निसर्ग चक्रीवादळानंतर अवघ्या तीनच महिन्यांत राज्य शासनाकडून 24.17 कोटींची नुकसान भरपाई मावळ तालुक्यातील जनतेला मिळाली. “निसर्ग’च्या या भरपाईमध्ये काळेबेरे असून, त्यामध्ये आमदारांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्याच पदरात “दान’ पडले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून अर्थात माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केला. यानंतर आमदार सुनील शेळके यांनी पलटवार करण्याची संधी सोडली नाही. आजी-माजी आमदारांमधील विकासकामांच्या कोट्यवधींच्या निधीवरून उठलेल्या वादळाची खमंग चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
भाजपच्या 1400 कोटींच्या विकासकामांवर भाष्य करीत “वर्षभरात मंत्रालयात निधी दिसलाच नाही’, असे म्हणून आमदार शेळके यांनी “टायमिंग’ साधले. “आसूड मोर्चाची खिल्ली’ आणि “वर्षभरात न दिसलेल्या 1400 कोटींच्या निधी’वर झालेल्या हल्ल्यानंतर बाळा भेगडे कमालीचे दुखावले. त्यानंतर आठवड्याभरातच भाजपने तब्बल 1600 कोटींच्या निधींचा “हिशोब’ देत आमदार शेळके यांना प्रतिआव्हान दिले. यामुळे मावळमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मावळ तालुक्यासाठी निसर्ग चक्रीवादळात नुकसान भरपाई म्हणून 24 कोटी 17 लाख रुपयांचा निधी शासनाकडून मिळाला. मात्र या नुकसान भरपाईवर भारतीय जनता पक्षाने आक्षेप नोंदविला आणि शेवटच्या घटकापर्यंत मदत मिळेपर्यंत साखळी उपोषणाची हाक दिली. त्यानंतर काढण्यात आलेल्या आसूड मोर्चाचा आमदार सुनील शेळके यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपने 1400 कोटींच्या कामाचा गाजावाजा केला खरा पण मला गेल्या वर्षभरात मंत्रालयात कुठेही 700 कोटी रुपये दिसले नाहीत, असे म्हणून स्थानिक भाजप अर्थात बाळा भेगडे यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
भाजपवर मावळ तालुक्याने 25 वर्षे विश्वास टाकला. मात्र भाजपने जनतेची दिशाभूल केली. मतदार, जनतेला फसविले. दहशत निर्माण केली जात आहे, असा टोला लगावत आमदार शेळके यांनी बाळा भेगडे यांना उत्तर दिले. टक्केवारीतून अधिकाऱ्यांची बदली करणारी आजपर्यंतची कार्यपद्धती, कार्यकर्त्यांसाठी मांडलेली “दुकानदारी’ अशा शेलक्या शब्दांचा वापर करत बाळा भेगडे यांच्यावर चांगलीच टीका केली. याशिवाय भाजपची सत्ता असलेल्या लोणावळा नगरपरिषदेतील बिल्डर आणि त्यांच्याशी असलेली “सेटिंग’ आता यापुढे सहन केली जाणार नाही, असा इशाराही दिला.
आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या ‘या’ हल्ल्यानंतर भारतीय जनता पक्षाने तथा बाळा भेगडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत 1400 कोटी रुपयेच काय 1600 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या लेखाजोखाच मांडला. भाजपने सोळाशे कोटींपेक्षा अधिक निधीचा “हिशोब’ दाखवित खुल्या चर्चेला बसण्याचे आव्हान आमदार शेळके यांना दिले. विद्यमान आमदार मावळच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे सांगितले. याशिवाय तळेगाव-चाकण रस्त्याच्या मंजुरीचा विषय, पर्यटनासाठी रस्त्यांचे पूरकजाळे निर्माण केल्याचा दावा करत “त्यांना’ आमदाकीच्या काळात रस्त्यांवरील एकही खड्डा बुजविता आला नाही, ते खड्डे आधी भरा असा टोलाही आमदार शेळके यांचे नाव न घेतला लगावला.
मावळ तालुक्यात 25 वर्षे भाजपाचा आमदार म्हणून निवडून येत होता. 2019 मध्ये पूर्वश्रमीचे भाजपचे असलेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून राष्ट्रवादीच्या रुपाने विजय खेचून आणला. त्यावरून बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात चांगलीच जुगलबंदी सुरू झाली आहे. तालुक्यात कोविड महामारी, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, पर्यटन, दूध उत्पादकांचे प्रश्न “आ’ वासून असताना आजी-माजी आमदार एकमेकांचे वाभाडे काढण्यात दंग असल्याने मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
तब्बल 855 पंचनामे पूरक निधी लटकलेला
मावळ तालुक्यात 7234 कुटुंबाच्या नुकसानीचे पंचनामे झाले असून शासनाकडून 24 कोटी 17 लाख रुपये मदत मिळाली. ग्रामस्तरीय समितीला छायाचित्र काढायच्या सूचना दिल्या होत्या. चुकीचे काम करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. नुकसान झाले पण मदत मिळली नसलेल्या 855 पंचनामे पूरक निधीची मागणी केली आहे. एक गावातून 200 तक्रारी आल्या असून, ज्यांचे नुकसान झाले आहे त्यानांच मदत मिळेल. तसेच परतीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असे तहसीलदार सांगत असले तरी प्रत्यक्षात ठोस माहिती देण्यास तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी टाळाटाळ केली. तर दुसरीकडे आजी-माजी आमदारांमध्ये नुकसान भरपाईवरून राजकारण केले जात असतानाच तहसील कार्यालयात 855 पंचनामे पूरक निधीच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.