पुणे – एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघाने पाकिस्तान संघाचा दारुण पराभव केला. क्रिकेट विश्वचषकात सलग आठवा विजय ठरला. यानंतर क्रिकेटप्रेमींनी शहरात फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा दणदणाट, विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला.
तिरंगा ध्वज, खेळाडूंचे पोस्टर हाती घेत “भारत माता की जय… वंदे मातरम्’चा नाराही देण्यात आला. यावेळी तरुणाईने शिट्या वाजवत नाचत आनंदोत्सव साजरा केला. भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत पाहण्यासाठी नागरिकांनी टी.व्ही, लॅपटॉप, मोबाइलसह अन्य साधनांचा वापर केला. यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. काही ठिकाणी एलइडी स्क्रीनही लावण्यात आली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांनी ठिकठिकाणी थांबत पण सामना पाहिलाच.
काही नागरिक चहा, खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांवर मोबाइलद्वारे सामना पाहत होते. प्रामुख्याने टी.व्ही.शोरुमबाहेर व हॉटेलांमध्येही क्रिकेटप्रेमींनी गर्दी होती. आठ वाजता सामना संपताच क्रिकेटप्रेमी जल्लोष साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले. अनेकांनी मोबाइलवर भारताच्या संघातील खेळाडूंचे फोटो, कौतुक करणारे मेसेजेस स्टेट्सवर ठेवले होते. फर्गसन रस्त्यावर गुडलक चौकात युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता.