नगर – राज्यातील सरकार हे जनतेच्या मनातील सरकार आहे. जनतेला जे पाहिजे, ते सरकारकडून दिले जात आहे. अधिकाऱ्यांनो जनतेशी चांगले वागा, तुमच्या वागण्यावर जनतेमध्ये सरकारची प्रतिमा अवलंबून आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. तसेच लोकाभिमुख कार्य व्हावे, यासाठी महसूल विभाग एकत्र आणण्याचे काम केले जात आहे. महसूल विभाग आता ऑनलाईन होत आहे. प्रत्येक तालुक्यात महसूल भवन उभे राहुन सर्व कार्यालय एका छताखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजुला 47 कोटी 86 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या महसुल भवन, नगर या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री विखे यांच्या हस्ते आज (दि.14) करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, खा. डॉ. सुजय विखे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विक्रम पाचपुते, अभय आगरकर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा. डॉ. सुजय विखे म्हणाले, नगर शहरात महसूल भवन उभे राहावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश येत महसूल मंत्री यांनी महसूल भवनाची निर्मिती केली आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्नमार्गी लागतील, आ. जगताप व मी एकत्र येऊन काम करत आहोत. शहराच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. आमच्यात शहरातील कुठल्याही विकास कामात श्रेयवादाची लढाई नाही. आता महसूल भावनात सर्व कार्यालय एकत्र येतील व नगर तालुका व शहरातील नागरिकांचे प्रश्न जलद गतीने सुटले जातील असे ते म्हणाले.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने महसुल विभाग अधिक सक्षम करण्याबरोबरच जिल्ह्यातील विकास कामांना अधिक गती देण्यात येत आहे. अहमदनगर शहर व ग्रामीण भागासाठी यापूर्वी एकच तहसिल कार्यालय होते. परंतु नागरिकांची कामे वेळेत व्हावीत या उद्देशाने शहरी व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तहसिल कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आ. जगताप म्हणाले, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केल्यानंतर नगर शहर व तालुका तहसील कार्यालय वेगळे करण्याचे काम केले आहे.
“त्यांना’ शरम कशी वाटत नाही?
नगर जिल्हा हा दूध उत्पादनामध्ये देशात एक नंबरचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे, 53 लाख लिटर दुधाचे उत्पन्न तयार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जोडधंदा असल्यामुळे नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी आहे, काही लोक दुधामध्ये भेसळ करत असून त्यांना शरम कशी, वाटत नाही जनतेला विष खाऊ घालतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
तरुणांना रोजगार
एमआयडीसीसाठी दूध संघाच्या जागेसह 500 एकर जागा तर उत्तरेत शिर्डी जवळील 500 एकर जागा ही औद्योगिकीकरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. वर्षात दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
“कुकडी’साठी संघर्ष अटळ
निळवंडे कालव्याच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान 26 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यामध्ये येणार आहेत. मंत्रीपदे ही शोभेची पदे नसून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहे. साकळाई पाणी योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कुकडीचे पाणी नगर जिल्ह्याला मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.