मुंबई – पन्नास खोक्यांवर “रॅप’ केले म्हणूून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राज मुंगासे याच्यानंतर उमेश खाडे व त्याच्या आई-वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेद्र आव्हाड यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. संत तुकाराम महाराज आज असते तर तेही कदाचित जेलमध्ये असते, असा संताप आव्हाडांनी व्यक्त केला आहे.
अलीकडची तरुण पिढी रॅप गाण्याच्या माध्यमातून वर्तमान परिस्थितीवर टोकदार भाष्य करत असते. त्यांच्या त्या गाण्यात काही आक्षेपार्ह शब्द असतात. भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेत झालेले बंड, त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर, नव्या सत्ताधाऱ्यांचा कारभार या साऱ्यावर सध्या अनेक रॅप गाणी येत आहेत. आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देताना राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत…
विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे. पोर-पोरींनो व्यक्त व्हा फासा लटकवणार का? मी कायम तुमच्याबरोबर आहे. आपला गळा दाबला जात आहे. ह्या लोकांनी नामदेव ढसाळ ह्यांनाही आयुष्यभर जेलमध्ये बसवले असते, असेही आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अशा प्रकारे दाबू शकत नाही. हे पोलिसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा, अशी मागणीही आव्हाड यांनी केली आहे.