जेडीएसने उडवली येडियुरप्पा यांची खिल्ली
बंगळूर -कर्नाटकमधील पूरस्थितीच्या हाताळणीवरून जेडीएसने त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी.एस.येडियुरप्पा यांची खिल्ली उडवली आहे. कर्नाटकमधील बंडखोर आमदारांना मुंबईला हलवण्यासाठी तुम्ही विशेष विमानाची व्यवस्था केली. मात्र, गरीब पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी तुम्ही एकाही हेलिकॉप्टरची व्यवस्था करू शकला नाहीत, असे जेडीएसने म्हटले आहे.
कर्नाटकच्या काही भागांना पाऊस आणि पुराचा मोठा तडाखा बसला आहे. मात्र, पूरस्थिती हाताळण्यात भाजप सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सरकारला लक्ष्य करण्यात जेडीएस आघाडीवर आहे. लाखों लोक संकटात असल्याचे पाहून तुम्हाला आनंद होतो का? त्यासाठीच तुम्ही चांगले काम करणाऱ्या सरकारला सत्तेवरून घालवले का, असे सवालही जेडीएसने विचारले आहेत.
काही आमदारांच्या बंडामुळे मागील महिन्यात कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे त्या राज्यात सरकार स्थापण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन विधानसभेत बहुमतही सिद्ध केले. आता त्यांच्या सरकारला विरोधकांनी पूरस्थितीवरून घेरण्यास सुरूवात केली आहे.