कोल्हापूर – कोल्हापुरातील अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ घडवणारी… भालजी पेंढारकर यांच्या स्मृतींचे स्मारक असलेली तसेच सध्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ताब्यात असणारी जयप्रभा स्टुडिओ ही वास्तू दोन वर्षांपूर्वीच 6 कोटी 50 लाखाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भारतीय चित्रपट व्यवसायामध्ये जयप्रभा यासारख्या स्टुडिओंनी सिनेमानिर्मितीचा पाया रचून ठेवला. 1934 साली कोल्हापूर सिनेटोन म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी जयप्रभा नावाचे जग उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आणि केवळ सिनेमानिर्मितीसाठीच ही जागा वापरली जावी अशी अटही घातली, अवघ्या दोन लाख 10 हजार रुपयांना ही जागा घेणाऱ्या भालजी पेंढारकर यांनी हा वारसा जपला. मध्यंतरीच्या काळात भालजींकडून स्टुडिओ लता मंगेशकर यांच्या ताब्यात आला. त्याला आर्थिक तोट्याचे कारण ठरले.
श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या भागीदारी फर्मने हा स्टुडिओ विकत घेतला असून, यात कोल्हापुरातील राजकीय नेत्याच्या मुलांचा समावेश आहे. लतादीदींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक कोल्हापुरात त्यांच्याच मालकीच्या जयप्रभा स्टुडिओत करण्याची मागणी जोर धरत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिली तर आम्ही “जयप्रभा’मध्ये त्यांचे स्मारक करू असे जाहीर केले. पण या स्टुडिओची मालकीच आता मंगेशकर कुटुंबाकडे राहिलेली नाही, त्यामुळे आता स्मारक करणार कुठे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे.
दुय्यम निबंधक यांच्या दप्तरी झालेल्या नोंदीनुसार लता मंगेशकर यांच्या नावे असलेल्या जयप्रभा स्टुडिओची खरेदी-विक्रीचा व्यवहार 15 फेब्रुवारी 2020 रोजी झाला. तर मालमत्ता पत्रकावर त्याची 3 जुलै 2020 रोजी नोंद झाली आहे. लता मंगेशकर यांच्या वतीने उषा मंगेशकर यांनी या जागेचा व्यवहार केला.
दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांनीच जयप्रभा स्टुडिओ खरेदी केल्याचे उघड झाले आहे. महालक्ष्मी स्टुडिओ नावाने जयप्रभा खरेदी केल्याची कागदपत्रात नमूद आहे. राजेश क्षीरसागर यांच्या ऋतुराज आणि पुष्कराज या दोन मुलांनी खरेदी केल्याचे उघड झाले आहे. मात्र आपण व्यवहाराबाबत अनभिज्ञ असून राज्य सरकारने स्टुडिओ खरेदी केल्यास परत देण्याची तयारी राजेश क्षीरसागर यांनी दर्शविली आहे.
खरेदीसाठीच फर्म स्थापन
महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या संस्थेची नोंदणी 3 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली. पुढे नऊ महिन्यांत जयप्रभाच्या खरेदी-विक्रीचा करार झाला. जयप्रभा स्टुडिओ वाचावा म्हणून एकीकडे कोल्हापूरकर गेली 10-12 वर्षे आंदोलने करत आहेत, मोर्चा, निषेध, कोर्ट कचेरी, न्यायालयाचे निर्णय, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केलेले प्रयत्न हा सगळा जयप्रभाच्या लढ्याचा इतिहास आहे. असे असताना दुसरीकडे कोल्हापूरकरांनीच तथाकथित स्टुडिओच्या नावाखाली जयप्रभाची वास्तू खरेदी केली. खरेदीपत्रात मात्र संगीत, नाट्य, कला क्षेत्रासाठी असा उद्देश देण्यात आला आहे.