मुंबई/कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. मंगळवार सकाळीही शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यामुळे पाऊस जरी कमी झाला असला, तरी नद्यांच्या पाणीपातळीत मात्र वाढ सुरूच आहे. पंचगंगेने सोमवारी पहाटेच इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे जिल्हातील प्रवण क्षेत्रासाठी तातडीचा इशारा जिल्हा प्रशासनाद्वारे जारी करण्यात आला आहे.
घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसाने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. दरम्यान, मंगळवारपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर असली तरी कोल्हापूर जिल्ह्याला अद्यापही पुढचे 24 तास महत्त्वाचे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उद्या 26 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभरात पंचगंगेच्या पाणीपातळीत एक फुटाची वाढ झाली असून, नदीची वाटचाल आता 43 फुटांच्या धोका पातळीकडे सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी येणाऱ्या ज्या-त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. दरम्यान, आतापर्यंत 83 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिह्यांतील 9 राज्यमार्गांसह एकूण 29 मार्ग बंद झाले आहेत.
स्थलांतरासाठी तयार राहावे
जिल्ह्यांत 2019 आणि 2021 मध्ये ज्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी 52 फूट झाली होती. त्यावेळी कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील ज्या-ज्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले होते, त्या सर्व कुटुंबांनी आज 25 जुलै 2023 रोजी सायंकाळपर्यंत सर्व साहित्यांसह स्थलांतरित होण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम
राज्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बुधवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात लातूरला झोडपले
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल वाहून गेल्याने तीन तासांसाठी वाहतूक बंद होती. लातूर- जहिराबाद महामार्गावरील शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील पर्यायी पूल वाहून गेला. हिंगोली शहर कळमनुरी यासह जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. जिल्ह्यात 332 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.