मुंबई : राज्यात झालेल्या सत्तापालटानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोजच शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “भाजप सत्तेविना राहू शकत नाही, म्हणून त्यांनी पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. मात्र, कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपचं आहे. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपने पक्ष फोडल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी पाटील यांनी केला.
पुढे बोलताना,”राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी चांगली साथ दिली. पवारसाहेबांनीचं पुढाकार घेऊन या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळं या विरोधी काही करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल असा टोला देखील पाटील यांनी भाजपला लगावला. शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती, ती भाजपप्रणित होती असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
शिवसेना फोडण्यात भाजपचा हात असल्याचे यातून स्पष्ट होतं असल्याचे पाटील म्हणाले. ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम, दाम, दंड, भेद वापरुन फोडणे योग्य आहे का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जन मताची छोटीशी चाचणी होणार आहे. उमेदवार पळवायचे काम हे करत असतील तर जनता हे पाहत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.