मुंबई – साल २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकारचे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत, देशाचा विकासदर घसरला आहे, महागाईचा नुसता भडका उडाला आहे, त्यातच मोदी सरकारने जनतेला हे रिटर्न गिफ्ट दिले आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
दरम्यान, सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षातील सर्वात निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोना संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षातील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेलाय. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षी आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे ७.३ टक्क्य़ांवर घसरला आहे, अशी देखील माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.