मुंबई : राज्यात मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाकडून आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला आहे. या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनीच खोचक टीका केली आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करून या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. जयंत पाटील म्हणाले की, राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे, ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. राज्य सरकार अपयशाचे खापर मोदींवर फोडत असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आणि मराठा आरक्षण गेल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.
सौ चुहे खाके बिल्ली हज को चली. #OBCreservation
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 26, 2021
तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो नाही तर राजकीय संन्यास घेतो असे आव्हान देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला दिले आहे. 50 टक्क्यावरीलही आरक्षण आम्ही वाचवले होते, पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले असंही फडणवीस यांनी म्हटलं.