Jayant Patil – समृद्धी महामार्गावर (samruddhi highway) रविवार झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे मध्यवर्ती भागातील दोन गर्डर आज सकाळी कोसळले. या दोन दुर्घटनांवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
जयंत पाटील म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम साधारणपणे 12 वर्षांपासून रखडले आहे. अतिशय संथगतीने सुरू असलेल्या या कामावरून अनेकदा स्थानिकांनी आंदोलने केली तरी, त्याला गती आलेली नाही.
दरवर्षी गणेशोत्सवात लाखो भाविक कोकणात जातात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात महामार्गाच्या कामाचा मुद्दा ऐरणीवर येतो. पण प्रत्यक्षात परिस्थितीमध्ये फार बदल झालेला नाही.
त्यातच मुंबई-गोवा महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा, असे आवाहन करतानाच कोकणवासीयांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.