शेवगाव – अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे, आढळा धरणासह नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर आदि धरणे शंभर टक्के भरली असल्याने या धरणांतून जायकवाडी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी झेपावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी रात्री साडे अकरा पासून जायकवाडी जलाशयाचे २७ दरवाजे उघडण्यात आले असून ८९६०४ क्युसेक्स पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे.
जायकवडीच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून भंडारदऱ्यातून प्रवरेत ३हजार ३५२क्युसेक्स, तर कालव्यात ३५४क्युसेक्स, निळवंड्यातून प्रवरेत ३ हजार ९०१ क्युसेक्स , मुळा डॅम मधून मुळा नदीत २हजार १७० क्युसेक्स, कोतूळ मधून १ हजार ५४३ क्युसेक्स, तर ओझर मधून प्रवरेत सोडलेले ३ हजार ४८२ क्युसेक्स पाणी जायकवाडीत येत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर मधून गोदावरीत २९ हजार ६०२,गंगापूर धरणातून ३ हजार ७०१ , दारणातून ५हजार ६८२ क्युसेक्स असे पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे.
बुधवारी जायकवाडी जलाशय ९ ८ . ८९ टक्के भरले असून धरणात एकूण १०१. ५९ ४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जायकवाडीची पाणीपातळी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप कार्यकारी अभियंता प्रेरणा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाट, शाखा अभियंता विजय काकडे, आदी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. कोणत्याही क्षणी जायकवाडी जलाशय १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोदावरीच्या पात्रातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जायकवाडीच्या २७ पैकी १८ दरवाजे ४ फुटाने तर ९ दरवाजे अर्ध्या फुटांनी उघडण्यात आले आहेत. धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने गोदावरी नदी पात्रात एक लाख क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
या अगोदर २००५ ते २००९ असे सलग पाच वर्षे धरण भरले होते. २००६ मध्ये धरण भरल्यानंतर दोन लाख ५४ हजार क्युसेक्स पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे २०१९ व २०२० साली देखील धरण भरल्याने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. तर १९९६ ला सर्वात निचांकी पाणी साठा झाला होता.